बोर्डाच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक किंवा इतर कर्मचाऱ्यांनी प्रोत्साहन दिल्याचे दिसून आल्यास किंवा त्यांचा प्रत्यक्ष सहभाग आढळून आल्यास अशा शाळांची मान्यताच रद्द केली जाईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत केली. दहावी आणि बारावीची परीक्षा सध्या सुरू असून, अनेक ठिकाणी कॉपीचे प्रकार उघडकीस येत आहेत. तसेच प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याचेही दिसून आले होते.
सध्या दहावीच्या परीक्षा सुरु असून औरंगाबाद जिल्ह्यातील एका शाळेत शिक्षक आणि इतर कर्मचारी हेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत बोलताना त्या शिक्षण संस्थेवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून, असा गैरप्रकार इतर शाळेत आढळल्यास त्यांच्यावरही अशी सक्त कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.
“विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. बोर्डाच्या परीक्षा त्यांच्या पुढील आयुष्याचा मुख्य पाया आहे आणि या परीक्षा भविष्यासाठी महत्वपूर्ण आहेत. या परीक्षा सुरक्षितपणे कोणत्याही अडचणीशिवाय पार पडाव्या आणि जेणेकरून भविष्यात विद्यार्थ्यांना निर्भीडपणे कोणत्याही समस्येला सामोरे जाता यावे, यासाठी शाळा, पालक, प्रसारमाध्यमे, लोकप्रतिनिधी आणि सर्व जनतेने शासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे” असे आवाहन देखील गायकवाड यांनी केलं.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील एका शाळेत झालेल्या प्रकरणामुळे शाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे देखील शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे. इतकेच नाही तर त्यांनी इथे हे सांगू इच्छिते, की असा गैरप्रकार इतर शाळेत आढळल्यास त्यांच्यावरही अशी सक्त कारवाई केली जाईल, असे गायकवाड म्हणाल्या. कॉपी सारखे प्रकार घडू नयेत म्हणून कॉपीविरोधी पथकाची सुद्धा नेमणूक करण्यात आली होती. मात्र असं असताना सुद्धा शाळेत कॉपी सुरुच असल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर अशा शाळांची मान्यता काढून घेतली जाईल, यापुढे अशा शाळांना परीक्षा केंद्रही दिले जाणार नाही असे त्यांनी सांगितले.