रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनामुळे चिंता वाढत चालली आहे. रविवारी सायंकाळी उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात सहा जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने सतर्कता बाळगत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात मास्क असेल तरच प्रवेश असा नवीन नियम लागू केला आहे. तर काही शाळांमध्येही मास्क सक्तीची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
२०७ जणांच्या स्वॅब तपासणीत हे सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून त्यातील एकूण १५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. कोरोना आल्यापासून ८४५२३ रुग्ण आजवर पॉझिटिव्ह निघाले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढल्यास बेडची अधिकची उपलब्धतता ठेवण्यात आली आहे.
राज्यात वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण व येणारी संभाव्य चौथी लाट या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. शाळा, ऑफिस, कॉलेज, बस, ट्रेन, ऑडिटोरियम, सिनेमा हॉल, हॉस्पिटलमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरीमध्ये कोरोनाचे फार काही रुग्ण नसले तरी खबरदारीचा उपाय म्हणून सिव्हिल सर्जन डॉ.फुले यांनी जिल्हा रुग्णालयासह अन्य शासकीय उपजिल्हा रुग्णालयात प्रवेश करतानाच मास्क सक्तीचा केला आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, रायगड, पालघर या सहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत चालला आहे. बऱ्याच ठिकाणी कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढला आहे. काही ठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट ५, ६, ८ टक्क्यांपर्यंत गेला आहे. त्यामुळे रत्नागिरीत रुग्णालयांमध्ये मास्कसक्ती करण्यात आली असून नागरिकांनाही काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.