नाणीज ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. येथील विशेष ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूर मधील हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन राज्य सरकारने सर्व ग्रामपंचायतींना विधवा प्रथा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसे परिपत्रक काढून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. त्या पार्श्वभुमीवर नाणीजला खास सभा घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
असा निर्णय घेणारी जिल्ह्यातील पहिलीच नाणीज ग्रामपंचायत ठरली आहे. जिने ही ग्रामसभा घेऊन ही प्रथा मोडीत काढली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच गौरव संसारे होते. या ग्रामसभेला सुमारे दोनशेहून अधिक महिला उपस्थित होत्या. त्याचबरोबर पुरुषांची मोठी उपस्थिती होती. या ग्रामसभेला रत्नागिरी जि. प. सीईओ इंदूराणी जाखड, रत्नागिरी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जे. पी. जाधव, गटविकास अधिकारी पी. एन. सुर्वे; प्राजक्ता शिरधनकर उपस्थित होत्या.
ग्रामपंचायतीने समाजात प्रचलित असलेल्या ‘अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन’ या महाराष्ट्र शासनाच्या जीआरप्रमाणे नाणीजमध्ये सर्व ग्रामस्थांमध्ये आणि वाड्यां-वस्त्यांवर जाऊन जागृती केली. ही अनिष्ट प्रथा कशी आहे याबाबत प्रबोधन केले आणि आज या ठिकाणी विशेष ग्रामसभा घेऊन सर्वानुमते ठराव मंजूर केला. या अनिष्ट प्रथेला मूठमाती देण्यात आली. याप्रसंगी इंदुराणी जाखड म्हणाल्या, ‘नाणीज ग्रामपंचायतीचा विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय अतिशय स्तुत्य आहे. त्याचे अनुकरण जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनी देखील करावे आणि महिलांना आधार द्यावा.
गटविकास अधिकारी जे पी जाधव यांनीही आपले विचार व्यक्त केले. त्याच प्रमाणे या ग्रामसभेत अनेक महिलांनीही याबाबत आपले परखडपणे विचार मांडले. या सभेचे सूत्रसंचालन ग्रा. प. सदस्य विजय गावडे यांनी केले, या उपक्रमाला जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांनीही शुभ आशीर्वाद दिले आहेत.
त्याचबरोबर नाणीजचे सरपंच गौरव संसारे, ग्रामसेवक आशिष खोचाडे; उपसरपंच राधिका शिंदे, गावचे पोलीस पाटील नितीन कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर कांबळे, ग्रामपंचायत सदस्य विनायक शिवगण, , राजन बोडेकर, रवींद्र दरडी, माजी ज्येष्ठ सरपंच नारायणराव सावंत, माजी पंचायत समिती सदस्य दाक्षायणी शिवगण रेश्मा बावडेकर , नाणीज सोसायटीचे चेअरमन प्रकाश कांबळे आदी उपस्थित होते.