जिल्ह्यातील चिपळूण शहराला दरवर्षी पूराचा चांगलाच तडाखा बसतो. गेल्या वर्षीच्या महापुरात चिपळूण पालिकेकडून झालेला दुर्लक्षितपणामुळे नागरिकांनी पालिकेला जबाबदार धरले होते. परंतु, यावर्षी तशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी सर्व विभागांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शिव आणि वाशिष्ठी नदीच्या काठावर वसलेल्या चिपळूण शहराला दरवर्षी पुराचा तडाखा बसतोच. पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी दोन महिन्यांपूर्वीच चिपळूण पालिकेने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. मदतकार्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व साधन सामुग्रीसह पालिकेत चोवीस तास नियंत्रण कक्ष व नागरिकांना सतर्क करण्यासाठी यंत्रणा स्रुरू करण्यात आली आहे. दरम्यान, १७ कर्मचाऱ्यांना यांत्रिक बोट चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे, नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास आपद्ग्रस्तांना स्थलांतरित करण्यासाठी शहरातील प्राथमिक मराठी शाळा, गोवळकोट उर्दू शाळा, डीबीजे महाविद्यालय, युनायटेड इंग्लिश स्कूल, पेठमाप उर्दू शाळा, खेंड मराठी शाळा, जीवन शिक्षण मराठी शाळा येथे स्थलांतरित केले जाणार आहे. त्याशिवाय शहरातील शासकीय इमारतीही सज्ज करण्यात आल्या आहेत.
महापुराची परिस्थिती उद्धभवली तर, त्याच्याशी दोन हात करण्यासाठी पालिकेने दोन महिने आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. पूर येण्याची वाट न बघता पूर परिस्थितीचा इशारा मिळाला की, पालिकेची यंत्रणा ताबडतोब कार्यान्वित होईल. नागरिकांचे स्थलांतर सुरू होईल. शहराचे कमीत कमी नुकसान व्हावे, यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.
शिवनदीतील गाळ काढण्यासह शहरातील नाले, पऱ्हे आणि गटारांची स्वच्छता करण्यात आली आहे. स्वच्छ केलेल्या गटारांमध्ये नागरिकांनी प्लास्टिक सह इतर अडकून राहणारा कचरा टाकू नये, यासाठी जागृती केली जात आहे. त्यासाठी पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊ नये म्हणून, नाईक कंपनी येथील जुना पूल तोडण्यात आला आहे. पूरस्थितीत मदतकार्यासाठी पूर्वसूचना गट, शोध व सुटका, प्रथमोपचार, भोजन, निवारा व्यवस्था, पिण्याचे पाणी, शहर स्वच्छता असे गट तयार करण्यात आले आहेत. पालिकेतील अधिकाऱ्यांवर प्रत्येक गटाची जबाबदारी देण्यात आली आहे.