मुंबई -गोवा महामार्ग चौपदरीकरण कामात महामार्गच्या बाजूला व्यवस्थित गटारे न बांधल्याने आज मुसळधार पडलेल्या पावसाचे पाणी व चिखल अंजणारी स्टॉप येथील दुकानामध्ये शिरले. त्यामुळे दुकानांचे मोठे नुकसान झाले. यासह महामार्गावर पाणी व चिखलाचे साम्राज्य पसरल्याने महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती.
रत्नागिरी जिल्ह्याच्या जवळपास सर्व भागात आगामी २४ तासांत अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. रत्नागिरी चिपळूण व जिल्ह्यासह अन्य भागात मुसळधार पाऊस पडत आहे. चिपळूणच्या डीबीजे कॉलेज परिसरात हायवेवर अक्षरश: तळ्याचे स्वरूप आले होते. जर चिपळूण सावर्डे मार्गावर कापसाळ येथे देखील रस्त्यावर पाणी साचले होते. त्यामुळे साचलेल्या पाण्यातूनच वाहनांना जिकरीने मार्ग काढावा लागत होता.
पावसाळ्याच्या सुरूवातीलाच महामार्गावर दरड कोसळणे, रस्ता खचणे, विजेचे खांब पडणे, झाडे पडणे, महमार्गाला भेगा पडणे अशा घटना घडू लागल्या आहेत. आज दिवसभर मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान पावसाळ्यापूर्वी सुरू केलेल्या महामार्गच्या अर्धवट कामाचा त्रास वाहन चालक व नागरिकांना बसत आहे.
आज मुसळधार पाऊस सुरु झाल्याने पावसाचे पाणी शिरल्याने, लांजा तालुक्यातील अंजणारी येथील दुकानांना मोठा फटका बसला. अंजणारी घाटात महामार्गाच्या बाजूने सुस्थितीत गटारे न काढल्याने व गटारामधील माती न काढल्याने पावसाचे पाणी व माती गटारात साठून महामार्गावर आली. पाणी, चिखल व माती मुंबई-गोवा महामार्गावर आल्याने अंजणारी येथे महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. या घटनेची माहिती नागरिकांनी महामार्ग ठेकेदाराला दिली असता जेसीबीच्या साहाय्याने महामार्गावर आलेली माती बाजूला करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. नद्यांची पाणी पातळी अचानक वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुख्यत्वे नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.