रत्नागिरीतील दापोली तालुक्यामध्ये मुरुड येथे राज्य परिवहन तथा रत्नागिरीचे पालक मंत्री अनिल परब यांचे समुद्रकिनार्याजवळ बांधण्यात आलेले साई रिसॉर्ट हे बेकायदेशीर असून मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. किरीट सोमय्या यांनी दापोली पोलीस स्थानकामध्ये अनिल परब यांच्या विरोधात दिलेल्या ५ पानी तक्रारीमध्ये एकूण ३३ मुद्द्यांचा उल्लेख केला आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्याकडे हा अर्ज दिला आहे. वरिष्टांचे मार्गदर्शन घेऊन या तक्रार अर्ज संदर्भात चौकशी करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.
मागील महिन्यापासून या प्रकारणातील एक ना अनेक बातम्या आपल्या वाचनात येत आहेत. मुरुड येथील साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणाच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी लेखी तक्रार दिली आहे. त्यामध्ये त्यांनी समुद्रकिनाऱ्याजवळील जागा हडपणे, सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करणे, सरकारी मालमत्ता, पदाचा गैरवापर करून सरकारी जमीनीचा स्वतःसाठी वापर करणे, बनावट कागदपत्रे सादर करणे, कागदपत्रांमध्ये खाडाखोड झालेली असताना सुद्धा शासकीय कर्मचार्यांनी स्वीकारणे इत्यादी एकूण ३३ मुद्द्यांचा उल्लेख केला आहे. तसेच या प्रकरणामध्ये त्यांनी सबंधित तलाठी, दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार, उद्योजक सदानंद कदम, यांच्या विरोधातसुद्धा लेखी तक्रार अर्ज दिला आहे. या तक्रारी संदर्भीय सगळ्यांवर त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली आहे. हा तक्रार अर्ज दाखल करताना भाजप उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, नगरसेविका जया साळवी आणि भाजपचे कार्याध्यक्ष मकरंद म्हादलेकर उपस्थित होते.
मी आणि डॉ. विनय नातू यांनी आज दुपारी दापोली पोलिस स्टेशनला अनिल परब साई रिसॉर्ट चा विरूध्द
भारतीय दंड संहिता 420…, पर्यावरण संवर्धन अधिनियम कलम 15 महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम कलम 52, 53, 54, 55, 56 आणि 56 (अ) व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 45 अंतर्गत तक्रार केली pic.twitter.com/Y3SCkuKr1D
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 2, 2021
या तक्रारीवरून अपर जिल्हाधिकारी शिंदे यांनी दापोली प्रांत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच चौकशी अहवालावरून पुढील कारवाई करण्यात येईल असे अपर जिल्हाधिकारी शिंदे यानी लेखी पत्राद्वारे किरीट सोमय्या यांना कळविले.