रत्नागिरी शहरी भागामध्ये सुरु असलेले विविध प्रकरचे खोदकाम, रस्त्यांची डागडुजी, रस्त्यात पडलेले खड्डे भरण्याचे काम, त्यानंतर त्यांच्या डांबरीकरणाचे कामकाज याबाबत चर्चा सुरु आहे. सत्ताधारींनी दिलेल्या शब्दाप्रमाणे, रस्ते गुळगुळीत व्हायला सुरुवात झाली आहे. परंतु, रस्त्याच्या सुरु असणाऱ्या कामाच्या दर्जाबद्दल मात्र साशंकता निर्माण होत आहे.
शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत होत असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप भाजपने याआधीही केला होता. प्रभाग क्रमांक ६ मध्ये तेथील स्थानिक नगरसेवक यांनी प्रभागात होत असलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत प्रभागातील एका इमारतीतील लोकांनी रस्त्याची कामे पूर्णत्वास नेल्याबद्दल अभिनंदन केल्याचे होर्डींग लावले आहे. शिवसेनेकडून रस्त्यांच्या होत असलेल्या आणि काही प्रमाणात पूर्णत्वास कामांबाबत प्रत्येक प्रभागात पोस्टर लावण्यात आले आहेत.
यावरती बोट ठेवत भाजपा चिटणीस निलेश आखाडे, ओबीसी जिल्हा महिला अध्यक्ष प्राजक्ता रुमडे, सरचिटणीस राजन पटवर्धन, मनीष डोईफोडे, प्रभागातील भाजपा कार्यकर्ते, नागरिक यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. रस्त्यांची कामे करून स्वतःच्या पाठीवर थाप मारून घेणारे निकृष्ट कामांचे ही श्रेय आपल्यावर घेणार का? निकृष्ट रस्त्यांच्या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी विद्यमान नगरसेवक करणार का? नाचणे पावर हाऊस ते पॉलिटेक्निक कॉलेज, गजानन महाराज मंदिरासमोरील रस्ता करून आठवडा झाला नाही, तोच यावर अवजड वाहने जाताच खाडी बाजूला होऊन, डांबर वर येऊन खड्डे पडू लागल्याने आश्चर्य व्यक्त केली जात आहे.
आत्ताच यावरील खडी-डांबर जास्त वजन पडल्याने निघून जात आहे. हे एवढे “उत्कृष्ट” दर्जाचे रस्ते किती दिवस टिकणार! याबाबत कोणी पुढे येऊन जबाबदारी घ्यायला उत्सुक आहे का? असा सवाल निलेश आखाडे यांनी उपस्थित केला आहे. तर पाणी पुरवठा योजना सुरू होऊन ही अनेक भागात कमी दाबाने पाणी मिळत आहे त्याचे नक्की कारण काय, याचा शोध घेण्यात आला आहे का? शहरातील नवीन पाणी योजना सुरू होताच अधिक दाबाने पाणी मिळणार होते, पण त्याचे उलटेच झाल्याचे दिसून येत आहे. असा प्रश्न प्राजक्ता रुमडे यांनी उपस्थित केला आहे.