रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे कमळ ४५ वर्षांनंतर फुलले त्याबद्दल खूप आनंद होत आहे. भाजपचे मतदार, नवमतदार, महिला मतदार व योजनांच्या लाभार्थ्यांनी भाजपला निवडून दिले आहे. या निमित्ताने कोकण विकासाला नवा आयाम मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी आमदार, लोकसभा सहप्रभारी बाळ माने यांनी व्यक्त केली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर बाळ माने यांनी सांगितले की, केंद्रीय नेतृत्वाने केलेली व्यूहरचना, दिग्गज नेते नारायणराव राणे यांना दिलेले तिकीट, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, अतुल काळसेकर, राजन तेली, प्रमोद जठार, मंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष, सर्व आघाड्यांचे प्रमुख यांनी केलेली मेहनत यामुळे भाजपने ही निवडणूक जिंकली आहे.
आम्ही वर्षभर चांगली मेहनत घेतली होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मेरा बूथ सबसे मजबूत, नमो संवाद सभांमधून मतदारांशी साधलेला संवाद यामुळे भाजपाला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ७२ हजार ४९७ मतदान मिळाले आहे. हे सर्व मतदान भाजपचेच आहे. नारायण राणे यांचा मतदार, भाजपचा मतदार, नवमतदार, लाभार्थी, महिला मतदार यांनी भाजपला विजयी केले. माने यांनी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक प्रक्रियेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आभार मानले.