खासगी दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या टेरिफ (रिचार्ज) यांच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे रत्नागिरीमधील ग्राहकही आता बीएसएनएलकडे वळू लागले आहेत. हे ग्राहक टिकून राहावेत, त्यांना विनाअडथळा सेवा मिळावी म्हणून बीएसएनएलने कंबर कसली आहे. शहरासह रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात नवे १८८ टॉवर उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. भारत दूरसंचार निगम बीएसएनएला आता शासकीय बूस्टर मिळाला आहे. त्यामुळे या कंपनीच्या पायाभूत सविधांकडे अधिक लक्ष केंद्रीत केले जात आहे.
ग्रामीण भागात बीएसएनएलला रेंज नाही, अशी तक्रार लवकरच इतिहासजमा होणार आहे. उपप्रबंधक अरुण चवळी यांनी याची माहिती दिली. खासगी दूरसंचार कंपन्यांच्या दरवाढीमुळे ग्राहकांचा ओढा बीएसएनएलकडे वाढत आहे. खासगी दूरसंचार कंपन्यांच्या दरवाढीमुळे बीएसएनएलवर लोकांचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे आमच्या सेवा अधिक सशक्त कशा होतील याकडे आमचे लक्ष आहे. फोर-जी सॅच्युरेशन ही मोहीम आम्ही हाती घेतली असून, या माध्यमातून जिल्ह्यात नवे १८८ टॉवर उभे करण्याचे काम सुरू आहे. सध्या रत्नागिरीमध्ये ३२४ टॉवर आहेत. खासगी कंपन्यांपेक्षा बीएसएनएलच्या टॉवरची संख्या वाढलेली दिसेल.
१८८ पैकी ९० टॉवरचे काम प्रत्यक्षात सुरू झाले असून, हे अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित ९८ टॉवर उभे करण्यासाठी तांत्रिक कामे चालू आहेत. ती पूर्ण करून आम्हाला ३१ डिसेंबरपर्यंत ते टॉवर उभे करायचे आहेत. त्यानंतर ग्राहकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात कमी होतील.
जुलैमध्ये साडेतीन हजार सिम खरेदी – चवळी म्हणाले, खासगी दूरसंचार कंपन्यांनी २५ टक्के दरवाढ केली आहे; परंतु बीएसएनएलने कसलीही दरवाढ केलेली नाही. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने बीएसएनएलकडे वळत आहेत. गेल्या पंधरा दिवसांत रत्नागिरीत साडेतीन हजार जणांनी बीएसएनएलचे सिमकार्ड घेतले आहे. याच कालावधीत जवळपास १४०० जणांनी आपले खासगी कंपन्यांचे सिमकार्ड बीएसएनएलमध्ये पोर्ट केले आहे. बीएसएनएलचे नवीन सिमकार्ड घेण्याकडे आणि पोर्ट काढण्याकडेही नागरिकांचा कल वाढत आहे.