कोकणाला निसर्गाची भरभरून सौंदर्याची देण आहे. अनेक ठिकाणी असलेल्या नदी, खाडी आणि समुद्रकिनारी पर्यटन व्यवसायाला वाव आहे. परंतु, शासनाचे लक्ष अजून तिथपर्यंत पोहोचले नसल्याने अनेक ठिकाणे विकासापासून वंचित राहिली आहेत. चिपळूण मधील दोणवली, गांग्रई व मालदोली परिसराला मोठ्या प्रमाणावर वाशिष्ठीचा खाडी किनारा लाभलेला आहे.
विपुल प्रमाणावर नैसर्गिक संपदा लाभलेला हा खाडी किनारा विकासापासून गेल्या अनेक वर्षांपासून वंचित आहे. दोणवली, गांग्रई व मालदोली असा जवळपास पाच किमीचा खाडी किनारा विकसित केल्यास येथील पारंपरिक मासेमारी व्यवसायाला व पर्यटनाला देखील चालना मिळेल. दोणवली, गांग्रई व मालदोली खाडी किनारा मेरिटाईम बोर्डामार्फत विकसित करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नीलेश चव्हाण यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे केली.
खासदार सुनील तटकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन, मालदोली जेट्टी येथे क्रोकोडाईल सफर पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक मनोरंजनासाठी येतात. त्यामुळे जवळपास परिसरातील दोणवली, गांग्रई व मालदोली खाडी किनारा विकसित केल्यास चांगले पर्यटन केंद्र होऊ शकेल. त्यामुळे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून खाडी किनाऱ्याचा विकास करण्यासाठी दोणवली, गांग्रई व मालदोली खाडी किनारा विकास करण्याकरिता निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी गावातील सामाजिक कार्यकर्ते नीलेश चव्हाण, गावातील जयंत चव्हाण, अस्मित चव्हाण, अमोल चव्हाण, मंगेश चव्हाण या तरुणांनी निवेदनाद्वारे केली आहे.
दोणवली सुतवी बंदरातून तसेच गांग्रई व मालदोली जेट्टी येथून मोठ्या प्रमाणावर पारंपरिक मासेमारी व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. येथील नागरिकांचे रोजगाराचे महत्त्वाचे माध्यम म्हणून हा मासेमारी व्यवसाय याच बंदरातून होतो, त्यामुळे जर त्याला अत्याधुनिक सुविधांची जोड मिळाली तर, नक्कीच ते हितवर्धक ठरेल.