एसटी महामंडळाच्या येथील विभागीय कार्यशाळा आवारातील भंगार लिलाव प्रक्रिया नुकतीच झाली. यामध्ये राज्यातील तब्बल २४ भंगार व्यावसायिकांनी सहभाग घेतला. भंगाराचा लिलाव झाल्यानंतर तो तातडीने उचलून नेला जावा यासाठी प्रतिदिन २० हजारांचे जागाभाडे एसटी विभागाकडून आकारण्यात आले. त्यामुळे लिलाव घेणाऱ्या काही भंगार व्यावसायिकांचा एसटीच्या अधिकाऱ्यांसोबत शाब्दिक वाद झाला. एमआयडीसीतील एसटीच्या विभागीय कार्यशाळेतील चार कोटी रुपयांच्या भंगाराचा लिलाव झाला. या लिलावात मुंबई, पुणे, कोल्हापूर, जालना, सातारा, सांगली, हैद्राबाद येथील भंगार व्यावसायिकांनी भाग घेतला. ज्यांना लिलाव मिळाला त्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या वजनाचे भंगार दुसऱ्या दिवसावल्या ट्रकने विभागीय कार्यशाळाव्यात आवारातून न्यायचे होते. ज्या व्यावसायिकांनी भंगार उचलण्यास विलंब केला त्यांना भंगार ठेवलेल्या जागेचे प्रतिदिन २० हजार रुपयेइतके भाडे मोजावे लागले.
सकाळी ८ ते सायं. ४ वाजेपर्यंत आवारातून भंगार नेण्याची मुभा होती. कार्यशाळेच्या आवारात येणाऱ्या ट्रकना काहीवेळ बाहेरच वाट पाहावी लागत होती. त्यानंतर संबंधित लिलाव प्रक्रियेच्या समितीतील अधिकारी आल्यानंतर त्यांनी आवश्यक कागदपत्रे पाहिल्यानंतर तो ट्रक आत घेतला जात होता. त्यानंतर भंगार भरले जात होते. एखाद्या दिवसाचे भाडे भरण्यास उशीर झाला तर ते भाडे भरल्याची पावती दाखवल्याशिवाय ट्रकमध्ये भंगार भरण्यास एसटीच्या अधिकाऱ्यांकडून मज्जाव केला जात होता. यावरून एसटी विभाग आणि भंगार व्यावसायिक आमनेसामने ठाकले आहेत. त्यांच्यात वारंवार शाब्दिक वाद झाल्याचा प्रकार पुढे आला आहे.