लोकसभेची ही निवडणूक देशाच्या सर्वोच्च सभागृहाची निवडणूक आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये कोकणाला काही मिळाले नाही. सभागृहात बोलणारा माणूस हवा; परंतु आपले खासदार वडापावशिवाय काही बोलतच नाहीत. नीलेश राणे अजूनही लोकांना हवे आहेत. तुमचे प्रेम आहे म्हणून मी येतो. हा राणे मरेपर्यंत तुमच्यासोबत राहील. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार येणार म्हणजे येणार. गुलालही आपलाच आणि फटाकेही आपलेच, अशी नवी ऊर्जा माजी खासदार नीलेश राणे यांनी बूथ कार्यकर्ते आणि सुपर वॉरियर्स यांना दिली.
नीलेश राणे म्हणाले, मी खासदारकीची निवडणूक लढलो तेव्हा मला २ लाख ७८ हजार मते मिळाली होती. देश मोदींच्या हातात असल्यामुळे गेल्या १० वर्षामध्ये देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत झालेली नाही. दुसऱ्याच्या हातात मतदार संघ गेला तर एक पिढी वाया जाते. कोकणाच्या विकासासाठी विद्यमान खासदारांनी १० वर्षांमध्ये काय केले? कोकण रेल्वे डबल ट्रॅकची मागणी होती. विमानतळ, टर्मिनल, काही झाले नाही. कारण, हे केंद्राचे विषय आहेत. आंबा, काजूसाठी एक प्रक्रिया उद्योग आलेला नाही. रिफायनरीसारखा मोठा प्रकल्प येणार होता. त्याला विरोध केला.
६० वर्षांचे स्वप्न पूर्ण होणार – रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर-लांजातून २४ तासात गोळा झालेला हा समुदाय पाहून खात्री झाली आहे की, रत्नागिरीतही आपली ताकद आहे. २०० बूथवर काम सुरू आहे. महायुतीचा उमेदवार २ लाख मताने निवडून येईल, याची खात्री झाली आहे. या जागेसाठी गेली ६० वर्षे राबणाऱ्या कार्यकर्त्याचे स्वप्न आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे. १० वर्षात खासदार विनायक राऊत यांनी काय केले ? त्याचा लेखाजोखा करायची वेळ आली आहे, असे प्रमोद जठार यांनी सांगितले.