दक्षिण आणि मध्य केरळमध्ये आठवडाभरापासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, आतापर्यंत १८ लोकांचा मृत्यू ओढवला आहे. तर कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यांच्या डोंगराळ भागामध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये तेथील २२ जण बेपत्ता झाल्याची भीती वर्तवली जात आहे.
पावसामुळे राज्यातील पूर परिस्थिती पाहता सखल भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. या कठीण काळामध्ये राज्य सरकारने मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराची मदत घेतली आहे.
हवामान विभागाने रविवारीही अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी पावसामुळे राज्यात ओढवलेली परिस्थिती लक्षात घेता, शनिवारी रात्री तातडीची बैठक बोलावली. बैठकी दरम्यान ते म्हणाले की राज्यात अतिवृष्टीमुळे परिस्थीती भयावह बनत चालली आहे, काही भागामध्ये परिस्थिती खरोखर हालाखीची बनली आहे. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आपण एकत्रितरीत्या सर्वतोपरी प्रयत्न करू. आम्ही लष्कर, नौदल आणि हवाई तिन्ही दलाची मदत मागावली आहे. जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मदत शिबिरे सुद्धा सुरू करण्यात आली आहेत.
सततच्या पावसामुळे राज्य सरकार सर्व धरणांच्या पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये दिली. कोट्टायम, पठाणमथिट्टा आणि इडुक्की हे तीन जिल्हे मुसळधार पावसामुळे जास्त प्रभावित झाले आहेत. दरम्यान, त्रावणकोर देवासम मंडळाने भगवान अयप्पाच्या भक्तांना १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी सबरीमाला मंदिरात न जाण्याचे आवाहन केलं आहे. तिकडे राज्यातील पंबा नदीतील पाण्याची पातळी चिंताजनक पातळीपर्यंत वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.
भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कोट्टायम, एर्नाकुलम, पठाणमथिट्टा, इडुक्की आणि त्रिशूर जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून, अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका कोट्टायम आणि पठाणमथिट्टा जिल्ह्यांना बसला असून, अतोनात नुकसान झाले आहे.