कोकण किनारपट्टीवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आणि लाखो भाविकांसाठी एक अत्यंत वाईट आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जागृत देवस्थान कुणकेश्वर ते रत्नागिरीचे आराध्य दैवत गणपतीपुळे दरम्यान धावणारी राज्य परिवहन महामंडळाची (ST) थेट बससेवा अचानक बंद करण्यात आली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून ही बस अतिशय यशस्वीपणे सुरू होती. मात्र, एसटी प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा प्रवाशांना कोणतेही स्पष्ट कारण न सांगता ही सेवा तडकाफडकी थांबवली आहे. यामुळे नियमित प्रवास करणारे नागरिक, नोकरदार, विद्यार्थी आणि लांबून येणारे भाविक यांचे प्रवासाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून, लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
धार्मिक पर्यटनाचा मुख्य कणाच मोडला कुणकेश्वर आणि गणपतीपुळे ही दोन्ही कोकणातील अत्यंत महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आहेत. या थेट बससेवेमुळे भाविकांना एकाच दिवशी दोन्ही देवांचे दर्शन घेणे सहज शक्य होत होते. फक्त एवढेच नाही, तर या मार्गावरून जाताना वाटेत लागणारी कात्रादेवी, आडीवरेची प्रसिद्ध महाकाली आणि पावस येथील स्वामी स्वरूपानंदांचे मंदिर अशा अनेक प्रमुख धार्मिक स्थळांनाही भाविक भेट देऊ शकत होते. एकाच प्रवासात कोकणातील प्रमुख मंदिरांची यात्रा घडवून आणणारी ही एकमेव हक्काची बस होती. विशेष म्हणजे, या बसला प्रवाशांचा नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळत होता आणि एसटीला यातून चांगला महसूलही (उत्पन्न) मिळत होता. असे असतानाही ही लोकप्रिय बस का बंद केली? असा सवाल आता सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.
किनारपट्टीच्या अनेक गावांची जीवनवाहिनी ठप्प ही बस फक्त देवाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांपुरती मर्यादित नव्हती, तर कोकण किनारपट्टीवरील अनेक छोट्या-मोठ्या गावांना जोडणारा हा एक महत्त्वाचा दुवा होती. देवगड, जामसंडे, पडेल, सागवे, जैतापूर, नाटे, आडीवरे, गावखडी आणि पावस यांसारख्या अनेक प्रमुख गावांमधील स्थानिक नागरिकांसाठी ही बस म्हणजे रोजची ‘जीवनवाहिनी’ होती. नोकरीला जाणारे कर्मचारी, व्यावसायिक आणि शाळे-कॉलेजचे विद्यार्थी या बसवर अवलंबून असायचे. आता ही सेवा अचानक बंद झाल्यामुळे या सर्वांची मोठी कोंडी झाली असून, त्यांना महागड्या पर्यायी वाहनांचा शोध घ्यावा लागत आहे.
कोकण किनारपट्टीवरील प्रवाशांचे होणारे हाल थांबवण्यासाठी कुणकेश्वर ते गणपतीपुळे दरम्यानची ही थेट बससेवा तातडीने पुन्हा सुरू करावी, अशी जोरदार मागणी आता प्रवासी आणि भाविकांमधून केली जात आहे. आता यावर रत्नागिरी आगार प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

