पाच महिन्यांच्या बेमुदत संपानंतर सुरू करण्यात आलेल्या एसटी बसकडे पुन्हा एकदा प्रवाशांचा ओढा वाढला असून, मुंबईला परतणाऱ्या चाकरमान्यांची पहिली पसंती ही लाल परीला असून दररोज लांजा आगारातून मुंबई, बोरिवली, परेल आणि कल्याण मार्गावर जाणाऱ्या चारही फेऱ्या प्रवाशांनी फुल्ल होऊन जात आहेत. आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे मे अखेर पर्यंतच्या सर्व फेऱ्यांचे आरक्षण फुल्ल झाले असल्याचे सांगितले आहे.
लग्नसराई, पालख्या, गावातील सार्वजनिक पूजा, ग्रामदैवतेचे काही कार्यक्रम यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी हे गावी आवर्जून दाखल होतात. उन्हाळ्याचा मोसम आटपून, चाकरमान्यांना आता पुन्हा एकदा मुंबईची ओढ लागली असून या सर्व मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांची प्रथम पसंती ही एसटी बसला मिळत असल्याचे एकूण चित्र दिसून येत आहे. गेल्या पाच महिन्यांच्या संपानंतर एसटी फेऱ्या व्यवस्थित सुरू झाल्या आहेत. मात्र कोकणात प्रवासासाठी रेल्वे आणि एसटी हीच लोकांची पहिली पसंती ठरत असल्याचे दिसून येत आहे. रेल्वेची तिकिटे मिळणे कठीण बनले असल्याने, अनेक जण एसटीचा मार्ग धरत आहेत. संपामुळे लांजा आगाराच्या अनेक एसटी बस गाड्यांचे आरटीओ पासिंग करण्यात आलेले नाही. त्यामुळे लांजा आगाराला एसटी बस गाड्यांची कमतरता भासत आहे.
मुंबईकर चाकरमान्यांचा प्रचंड ओढा हा एसटीकडे वळला आहे. मात्र एसटी बस उपलब्ध असल्या तरी आरटीओकडून त्यांचे पासिंग झालेले नसल्याने मागणीच्या तुलनेत लांजा आगाराकडे एसटी फेऱ्यांची कमतरता आहे. लांजा आगारामार्फत मुंबई चाकरमान्यांसाठी दररोज मुंबई, बोरिवली, कल्याण आणि परेल या मार्गांवर जादा फेऱ्या सोडण्यात येत आहेत. या बरोबरच प्रवाशांच्या मागणीनुसार सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत आरक्षण खिडकीवर आरक्षण उपलब्ध करून दिलेले असून प्रवाशांनी या खिडकीवर तिकीट बुक करण्याचे आवाहन संदीप पाटील यांनी केले आहे.