रत्नागिरीमधील मंडणगड तालुक्यामध्ये एकाच दिवशी तब्बल १७८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेची पाचावर धारण बसली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, विविध उपाययोजना राबविताना दिसत आहे. पण तरीही कोरोना संक्रमितांची रुग्ण संख्या वाढतच जात आहे. तरीही १५ मे पासून ३१ मे पर्यंत सुरु असलेल लॉकडाऊन जिल्हा प्रशासनाने अजून ७ दिवस वाढवून कडक लॉकडाऊन जाहीर केले. परंतु, तरीही काही कारणास्तव कोरोना संक्रमितांची संख्या चढ्या क्रमानेच आहे.
मंडणगड तालुक्यात एकत्रित रित्या १७८ रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्याने आरोग्य यंत्रणेसह संपूर्ण जिल्हा हादरला. या प्रकरणावर नजर घातली असता, कोरोना रुग्णांनी केलेल्या चाचणीचे अहवाल यायला उशीर झाल्याने एवढया जास्त प्रमाणात रुग्ण पॉझिटीव्ह आले. कोरोना अहवाल मिळायला साधारण १-२ दिवस कालावधी लागतो, परंतु मंडणगड मध्ये अहवाल ९ दिवसांनी प्राप्त झाल्याने टेस्ट केल्या दिवसापासून रुग्ण आठवडाभर सगळीकडे फिरत वावरत राहिल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अजूनही १०० जणांच्या चाचणीचे अहवाल येणे बाकी आहे. या प्रकरणाची गंभीर दाखल घेत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी अहवालाला एवढा विलंब करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. तसेच अशीच लोक कोरोना सुपर स्प्रेडर ठरू शकतात, त्यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी जास्तीच बिघडण्याची शक्यता आहे.
मंडणगड आणि आसपासच्या परिसरातील गावांमध्ये पाहायला गेलं तर प्रत्येक घरापाठी एक रुग्ण पॉझिटीव्ह आहे. त्यामुळे जरी टेस्ट केली असली तरी अहवाल येईपर्यंत तरी प्रत्येक नागरिकाने स्वताची जबाबदारी लक्षात घेऊन इतरत्र न फिरता घरातच राहावे. जेणेकरून कोरोनाची लागण इतरत्र पसरणार नाही. असे कोणी आढळले तर संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येईल.