उदय सामंत यांचा मंत्रिमंडळात समावेश करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला बळ देऊन कोकणात पकड मजबूत करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे. उदय सामंत हे सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री होते. पण रत्नागिरी जिल्ह्यातील पालकमंत्री अनिल परब यांच्या अनुपस्थितीत उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यात दौरे करून हा जिल्हाही सांभाळला होता.
सामंत यांचा संपर्क या दोन्ही जिल्ह्यात ऊत्तम आहे. त्यांनी आठ वर्षांपूर्वी निवडणुकीत राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करत उमेदवारी दाखल केली होती. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ त्यांनी एकहाती आपल्याकडे ठेवला आहे. सामंत यांच्यासाठी हा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ आजही सुरक्षित समजला जातो. उदय सामंत यापूर्वी ठाकरे सरकारमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पदावर होते. शिंदे फडणवीस सरकारमध्ये कोणती जबाबदारी दिली जाते याची उत्सुकता अनेकांना लागून आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही सामंत यांच्याकडेच येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोकणामध्ये उद्य सामंत हे एक ज्येष्ठ आमदार आहेत. कोकणात रामदास कदम आणि त्यानंतर उदय सामंत यांनी शिंदे गटात सामील होऊन मविआ ठाकरे सरकारला दिलेला धक्का ही मोठी राजकीय घडामोड असून सामंत यांना मंत्रिमंडळात स्थान देत ठाकरे गटाला शह देण्याची मोठी खेळी मानले जात आहे.
उदय सामंत यांच्याबरोबरच कोकणातून आमदार दीपक केसरकर व भाजपचे रवींद्र चव्हाण आणि मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिपदाची संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बंडखोर तथा शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचे वृत्त समजते आहे.