भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर नौदल विभाग व मत्स्य व्यवसाय विभागाची ७ मे रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये भारतीय नौदल विभागाकडून ऑफशोअर डिफेन्स एरिया’ मासेमारी प्रतिबंध क्षेत्र (नो फिशिंग झोन) घोषित करण्यात आले आहे. नौदल विभागाने आखून दिलेल्या परिसरामध्ये कोणतीही नौका आढळून आल्यास दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे (शूट टू किल) आदेश नौदल विभागास देण्यात आलेले आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा याबाबत सुरक्षित असला तरी मत्स्यविभागाने सतर्कता बाळगत सर्व नौकांची कसून तपासणी सुरू केली आहे. बैठकीमध्ये आठ झोन तयार करण्यात आले आहेत. सुमारे ८० नॉटिकल मैल समुद्रीअंतर आहे.
खोल समुद्रातील हा भाग आहे. तो साधारण ठाणे, पालघर आदी भागात पुढे येतो. या झोनमध्ये कोणतीही मासेमारी नौका मासेमारीस वा अन्य कोणत्याही प्रयोजनास जाणार नाही. तसेच नौदल विभागाने आखून दिलेल्या परिसरामध्ये कोणतीही नौका आढळून आल्यास दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश नौदल विभागास देण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोणतीही मासेमारी नौका जाणार नाही याबाबतची दक्षता सर्व नौकामालक व मच्छीमार यांनी घ्यावी. मच्छीमार नौकांच्या सर्वेक्षणाकरिता नौदल विभागाकडून संस्थानिहाय नौकांची माहिती मागवण्यात आली आहे. ही माहिती परवाना अधिकारी यांच्यामार्फत तत्काळ साहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय या कार्यालयास सादर करावयाची आहे.
आपत्कालीन कार्य केंद्र कार्यरत ठेवा : चंद्रकांत सूर्यवंशी – राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरण व्यवस्थापन यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत सध्या देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आपत्कालीन कार्य केंद्र (ईओसी) सतत कार्यरत ठेवा, असे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली. सर्व विभागाचे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आपत्कालीन कार्य केंद्र (ईओसी) चोवीस तास कार्यरत ठेवावेत. कक्षात पोलिस व होमगार्डच्या प्रशिक्षित नियुक्ती करावी. तसेच आवश्यकता असल्यास एनसीसी, एनएसएस, नेहरू युवा केंद्र स्वयंसेवक, आपदा मित्र यांची नेमणूक करावी व त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे.
जिल्ह्यांमध्ये रेशन आणि औषधांचा पुरेसा साठा सुनिश्चित करावा. कोणतीही अनावश्यक साठेबाजी होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. स्थलांतरित लोकांसाठी सुरक्षित निवारा केंद्रे निश्चित करावी व सदर निवारा केंद्रे सुरक्षित ठिकाणी असल्याची खात्री करावी. या निवारा केंद्रापर्यंत पुरेसे अन्न आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. आवश्यक असलेल्या ठिकाणी सायरन खरेदी करून स्थापित करावेत. जिल्ह्यात कोणतेही सैन्याचे सामान (उदा. गोळाबारीचे अवशेष) पडलेले आढळल्यास, नागरिकांनी ते स्पर्श करू नये, त्याबद्दल तत्काळ जिल्हा नियंत्रण कक्ष व पोलिस नियंत्रण कक्षास कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तरी आम्ही सतर्क – रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा सुरक्षित असला तरी आम्ही सतर्क आहोत. मासेमारी करणाऱ्या सर्व नौकांची बंदरामध्ये आणि समुद्रात गस्तीदरम्यान तपासणी केली जात आहे. प्रत्येक खलाशी, तांडेल आदींची आधारकार्ड तपासली केली जात आहेत. सर्व मच्छीमार सोसायट्या आणि मच्छीमारांना याबाबत अवगत केले आहे, अशी माहिती कुवेसकर यांनी दिली.