पावसाचे घटलेले प्रमाण पाहता जिल्ह्यात पाणीटंचाई लवकरच भेडसावण्याची शक्यता असल्याने डिसेंबरपूर्वी प्रत्येक तालुक्याचे टंचाई कृती आराखडे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लांजा आणि संगमेश्वर या दोनच तालुक्यांचे आराखडे आतापर्यंत सादर झाले आहेत. उर्वरित तालुक्यांमधील टंचाईच्या बैठकाच झालेल्या नसल्याने जिल्ह्याचा एकत्रित पाणीटंचाई कृती आराखडा रखडण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्ह्यात सप्टेंबरअखेरीला पावसाने रामराम केला. नोव्हेंबरमध्ये थंडी पडण्याऐवजी उष्म्याचा कडाका ऑक्टोबरचा डिसेंबरच्या मध्यानंतरही कायम आहे.
सध्याचे वाढलेले तापमान पाहता जिल्ह्याला पाणीटंचाईला लवकर सामोरे जावे लागणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. चिपळूण तालुक्यातील दोन गावांमध्ये तर पाणीटंचाई सुरू झाली आहे. या तालुक्याचा अद्याप टंचाई कृती आराखडाच तयार झालेला नाही. त्याचबरोबर मंडणगड, दापोली, खेड, गुहागर आणि रत्नागिरी या तालुक्यांचेही पाणीटंचाई कृती आराखडे तयार झालेले नाहीत. केवळ दोन तालुक्यांचेच आराखडे आल्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा तयार करणार कसा, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
तालुकास्तरावर दुर्लक्ष – जलजीवनच्या माध्यमातून पाणीयोजना राबवण्यात आल्या असल्या तरी पाण्याचे स्त्रोत आटल्यास पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठीच कृती आराखडे लवकरच तयार करून त्यावर वेळेत काम होणे आवश्यक आहे; मात्र त्याकडे तालुकास्तरावर दुर्लक्ष केले जात आहे.
आराखड्याची रक्कम वाढणार – जिल्ह्यात गतवर्षींचा पाणीटंचाईचा कृती आराखडा निम्म्यावर आणण्यात आला होता. गतवर्षी टंचाई आराखडा फेब्रुवारी अखेर मंजूर करण्यात आला होता. ५ कोटी ७३ लाख रुपयांचा आराखडा तयार करून त्याला मंजुरी देण्यात आली होती. यंदा लवकरच पाणीटंचाई सुरू झाल्याने टंचाई आराखड्याच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे.