कोल्हापूर मधील हेरवाड ग्रामपंचायतीने केलेल्या विधवा प्रथा बंदीच्या ठरावाचे रूपांतर शासन परिपत्रकात केल्यानंतर अनेक जिल्हा आणि तालुक्यामध्ये देखील विधवा बंदी ठराव मोठ्या प्रमाणात संमत केला आहे. रत्नागिरी तालुक्यातील पानवल गावात विधवा प्रथा बंदीचा एकमुखी ठराव संमत करण्यात आला. ८ ऑगस्टला झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषद प्रशासनाकडून १५ ऑगस्टपर्यंत शंभर टक्के गावांमध्ये हा ठराव करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.
पानवल येथे झालेल्या ग्रामसभेत विधवा अनिष्ट प्रथा व त्यामुळे स्त्रियांना भविष्यात होणार्या त्रासाबाबत भोगाव्या लागणार्या यातनांची यादी ग्रामसचिव नयना पंगेरकर यांनी उपस्थित ग्रामसभेत लोकांसमोर पटवून दिली. ग्रामपंचायत सदस्य शशिकांत कांबळे व संजय होरंबे यांनी अनिष्ट प्रथा व अंधश्रद्धा याबाबत आपले मत मांडत अनिष्ट प्रथेतून स्त्रियांना मुक्ती मिळावी व त्यांनी पती पश्चातही आपल्या जीवनात न घाबरता आणि न डगमगता आयुष्य पूर्वीप्रमाणेच उपभोगावे, असे मत मांडले. पतीच्या निधनानंतर महिलांना दिली जाणारी हीन दर्जाची वागणूक बंद होऊन तिला आधार देण्यात यावा. विधवा प्रथा बंदीला ग्रामस्थांकडून एकमुखी सहमती दर्शवण्यात आली. १५ ऑगस्टला विधवा महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामसभेला सरपंच तनिष्का होरंबे, उपसरपंच रवींद्र मांडवकर, अपर्णा बोरकर, श्वेता मांडवकर, प्रसिद्धी होरंबे, अक्षरा शिंदे, शशिकांत कांबळे, संजय होरंबे, राकेश घवाळी यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रसंगी अपर्णा बोरकर यांची तंटामुक्त अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ठराव झाल्यानंतर त्याचे तंतोतंत पालन करण्यासाठी ग्रामस्थांनाही आवाहन करण्यात आले.