राज्यामध्ये प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली असली तरी, अजूनही अनेक भागांमध्ये प्लास्टिक सर्हास विकले जात आहे. अतिरिक्त वापरामुळे मोठ्या प्रमाणात वाढणारे प्रदूषण आणि गटारांवरती होणारा विपरित परिणाम हा संभाव्य धोका टाळण्यासाठी शासनाने प्लास्टिक बंदी सुरू केली आहे. तरीही प्लास्टिक विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
जिल्ह्यात पावस परिसरामध्ये प्लास्टिकचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक दुकानदाराना दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु, लोकांची मानसिकता बदलत नसल्यामुळे, ग्राहक राजरोसपणे प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर करत आहे. राज्यामध्ये दारूबंदी, गुटखाबंदी आणि अंमली पदार्थ बंदी आधी गोष्टी शासनाच्या वतीने करण्यात येत आहेत; परंतु हि बंदी केवळ कागदोपत्रीच राहत असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रत्यक्षात मात्र कोणतीही अंमलबजावणी होत नसल्यामुळे या गोष्टी ज्यादा दराने विकल्या जात आहेत. यामुळे बंदीचा फायदा उत्पादन करणाऱ्या लोकांना जास्त होत आहे.
त्यामुळे या गोष्टीच्या मुळाशी जाऊनच ती नष्ट केली पाहिजे. या प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवरच योग्य ती कारवाई करावी म्हणजे खऱ्या अर्थाने प्लास्टिक बंदी होईल असे दुकानदारांमधून बोलले जात आहे.
उत्पादन करणाऱ्या कंपन्या जास्त दर लावून आपला व्यवसाय करत आहेत. या संदर्भात संकेत राडये यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, प्लास्टिक बंदी करावी याला आमचा विरोध नाही; परंतु याची प्रत्येकाला चटक लागलेली आहे. त्यामुळे मुळात ही चटक कमी करण्यासाठी प्रत्यक्षात उत्पादन करणाऱ्या प्लास्टिक कंपन्यांवर बंदी घातली तरच खऱ्या अर्थाने बंदी होऊ शकते. अन्यथा या गोष्टी राजरोसपणे सुरूच राहणार आहेत.