महामार्गावरील अपघातांची मालिका सुरुच आहे. अनेक अवजड वाहनांची बेदरकारपणे चालवून एखाद्याच्या मृत्यूला जबाबदार ठरतात. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये धामणदेवी गावाच्या हद्दीमध्ये मंगळवारी सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास अज्ञात ट्रक चालकाने चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करून समोरून येणार्या मोटारसायकल स्वारास जोरदार धडक दिल्याने तो जागीच गतप्राण झाला आहे. अपघातानंतर चालक ट्रक घटनास्थळीच सोडून पसार झाला आहे.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यांच्या सीमवर्ती भागात असलेल्या महामार्ग पोलीस केंद्र, कशेडीच्या हद्दीमध्ये मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ वर धामणदेवी गावच्या हद्दीत घाटामध्ये आज मंगळवार दि.१९ एप्रिल२०२२ रोजी सकाळी पावणेसात वाजण्याच्या दरम्यान तळोजा ते लोटे जाणारा ट्रक क्रमांक एमएच ०४ डीके ७२५८ वरील अज्ञात चालकाने ओव्हरटेक करून चुकीच्या बाजूला जाऊन समोरून पेढांबे चिपळूण ते मुंबइकडे मोटर सायकल एमएच-०८-एव्ही-३७२६ घेऊन जाणारा मोटारसायकलस्वार अथर्व मोहन सावंत वय-२५ वर्षे, रा.पेढांबे, ता. चिपळूण, जि.रत्नागिरी यांच्या मोटरसायकलला जोरदार ठोकर देऊन अपघात केला. या अपघातामध्ये मोटारसायकलस्वार अथर्व मोहन सावंत याचा जागीच मृत्यू झाला. अथर्वचा असा अपघाती मृत्यू झाल्याने, कुटुंब आणि मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.
अपघातस्थळी पोलादपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी आले असून त्यांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय पोलादपूर या ठिकाणी पाठविला. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक ट्रक अपघातस्थळी पळून गेला असून अपघातस्थळी एकेरी वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली. कशेडी टॅप पोलीस ठाण्याचे पीएसआय चांदणे यांनी याकामी तातडीने प्रयत्न केले.