काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने सोमवारी दिल्ली मुख्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. सोमवारी देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयांसमोर हा निव्वळ त्रास देण्याचा प्रकार असल्याचा आरोप करत निदर्शने केली. मुंबईत देखील निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ईडी कार्यालयापर्यंत पोहोचण्यापासून रोखले होते.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी नॅशनल हेरॉल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी समोर हजर झाले. सकाळी ११.१० वाजता ईडीच्या मुख्यालयात पोहोचलेल्या राहुल यांची दोन टप्प्यांत १० तासांपेक्षा अधिक काळ चौकशी करण्यात आली. त्यांना ५०च्या वर प्रश्न या कालावधीत विचारण्यात आले. तुमची किती आणि कोणकोणत्या बँकांमध्ये खाती आहेत, असा प्रश्न ईडीने राहुल यांना केला. विदेशी बँक खाती आणि संपत्तीबाबतही त्यांना विविध प्रकारे प्रश्न विचारण्यात आले. त्यांची रात्री १० वाजेपर्यंत चौकशी सुरु होती.
परंतु, काही प्रश्नांची उत्तरे समाधानकारक न मिळाल्याने ईडीने त्यांना दुसर्या दिवशी म्हणजे आज पुन्हा बोलावले आहे. दुसरीकडे, काँग्रेसने दिल्लीसहित देशभर ईडीविरुद्ध सत्याग्रह पुकारला. या दरम्यान दिल्लीत पायी मार्च करत असलेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह २६ खासदार, ५ आमदारांसह ४५९ नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सकाळी ११.०० वाजता राहुल गहलोत, बघेल, पी.चिदंबरम, प्रियंकांसह काँग्रेसच्या नेत्यांसोबत पक्ष मुख्यालयातून पायी ईडी कार्यालयाकडे गेले. या नेत्यांना पोलिसांनी ईडी मुख्यालयाआधी रोखल्यावर त्यांनी धरणे आंदोलन केले. यानंतर राहुल गाडीतून ईडी मुख्यालयात गेले. चिदंबरम म्हणाले, तीन पोलिस अंगावर धावून आल्याने बरगडीला फ्रॅक्चर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे संगठन सरचिटणीस वेणुगोपाल यांनाही पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी म्हटले की, भ्रष्टाचाराला संरक्षण देण्यासाठी, गांधी कुटुंबाची २००० कोटींची संपत्ती वाचवण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरला आहे. जामिनावर असलेले लोक आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी आंदोलन करत आहेत. ईडीवर दबाव आणण्यासाठी नेत्यांना दिल्लीत बोलावले आहे.