गेल्या अनेक दिवसांपासून राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिसत होते. त्याची घोषणा अखेर आज कोल्हापुरात झाली आहे. महाविकास आघाडी आणि आमचे सर्व संबंध संपले असे राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात जाहीर केले आहे. मी आज तुमच्या सगळ्यांच्या वतीनं जाहीर करतो आणि मविआचे आणि आमचे संबंध सगळे संपलेले आहेत. त्यामुळे पुढे सोबतीला कोणत्या पक्षाचे सहाय्य घेणार कि एकला चलो रे हि भूमिका अवलंबणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊ. त्याला ही सगळी परिस्थिती सांगू. दिल्लीवाल्यांनी फसवलं, मुंबईवाल्यांनी फसवलं. आम्हाला आता आमच्या मनगटावर न्याय मिळवून द्यायचाय. सरकार स्थापन झाल्यानंतर अडीच वर्षात अनेकदा मागणी करूनही संघटनेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून न घेतल्याने शेट्टी यांच्यासह सर्वच नेते नाराज होते. ही नाराजी त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली. आघाडीचे प्रमुख शरद पवार यांनाही पत्राद्वारे आपली नाराजी त्यांनी कळवली होती. पण सरकारने याबाबत कोणतीच दखल न घेतल्यामुळे अखेर आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय शेट्टी यांनी जाहीर केला.
आता या सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये निराश होऊन तडफडून मरण्यापेक्षा लढता लढता मरण्याचा निर्णय घेऊयात, असे आवाहन यावेळी राजू शेट्टी यांनी जाहीर केले आहे. माजी खासदार व स्वाभिमान शेतकरी संघटनेचे प्रमुख असलेल्या राजू शेट्टी यांनी घेतलेला हा मोठा निर्णय आहे. त्यांनी महाविकास आघाडीतुन आपण बाहेर पडत असल्याचे सांगत एकप्रकारे जोरदार दणकाच दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आता महाविकास आघाडीत नाही असे त्यांनी कोल्हापूर येथे झालेल्या संघटनेच्या राज्यकार्यकारणी बैठकीत सांगितले.