रत्नागिरी जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून पद ग्रहण केलेले धनंजय कुलकर्णी यांनी आपली वेगळीच छाप सोडायला सुरुवात केली आहे. रत्नागिरी शहरी भागामध्ये ठराविक वेळेसाठी वाहतूक कोंडी निर्माण होते आणि काही वेळेला अपघाताच्या घटना घडतात त्यामुळे, प्रत्येक नागरिकाने सावध राहून आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
त्याचप्रमाणे अनेक ग्रामीण भागांमध्ये अवैध रित्या काही गोष्टी सुरु असतात. काळोखाचा फायदा घेऊन गावात काही भागामध्ये दारूच्या भट्ट्या पेटवल्या जातात. त्याचा जिल्ह्यातून समूळ नाश करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अॅक्शन मोडवर आले आहेत. दारू, जुगार, मटका यामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होतात त्यामुळे वेळीच त्याला रोखणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील अवैद्य दारूधंद्याला चाप बसण्याच्या दृष्टीने त्यांनी महत्वाच्या निर्णय घेतला आहे. गावठी दारूधंदे व मटका जुगार अड्ड्याची माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. त्यासाठी त्यांनी एक मोबाईल क्रमांक दिला असून त्यावर माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाणार असून, तक्रारीबाबत तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
याबाबत गोपनीय व सत्य माहिती फोन व व्हॉट्सअॅपद्वारे देण्यासाठी पोलिसदलाचा अधिकृत संपर्क (८२६३८८३३१९) असा दिला आहे. जर आपल्या आजुबाजूला अवैध गावठी हातभट्टी दारू निर्माण केंद्र, गावठी हातभट्टी दारू वितरण विक्री केंद्र ,गावठी हातभट्टी साठा ठिकाणी गावठी हातभट्टीने आण करणे व गावठी हातभट्टी साठा ठिकाणी गावठी हातभट्टीने व मटका व जुगार अड्डा दिसून आल्यास वरील संपर्क क्रमांक त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. वरील माहिती देणाऱ्या सर्व व्यक्तींचे नाव, पत्ता व इतर माहिती गुप्त ठेवण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जनतेला दिले आहे.