रत्नागिरी शहरातील गेले वर्षभर सुरु असलेले रस्त्याची डागडुजी आणि पाण्याच्या पाईपलाईनची कामे यामुळे पावसाळ्याच्या काही दिवस आधीच कामे पूर्ण झाली. परंतु, तीन महिन्यांपूर्वी गुळगुळीत केलेले शहरातील रस्त्यांवरवर पुन्हा खड्डे निर्माण झाले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. डांबरीकरणाचा ठेका देण्यापूर्वी ठेकेदारांला पूर्वकल्पना देऊनच हा करार करण्यात आला होता. मात्र रस्ते डांबरीकरणानंतर अवघ्या काही महिन्यातच उखडलेले दिसून येत आहेत. खड्डेमय रस्त्यांची डागडुजी करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारांची असून याबाबत ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिली.
शहरात नव्या पाणी योजनेचे काम हाती घेण्यात आल्याने संपूर्ण शहरात खोदकाम हाती घेण्यात आले. तसेच सीएनजी गॅस लाईन टाकण्यासाठी देखील खोदकाम झाले. रस्त्यांच्या मधोमध खोदकाम करण्यात आल्याने रस्त्यांची पूर्ण दुरवस्था झाली. रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी उदय सामंत यांनी कोट्यवधींचा निधी आणला. डांबरीकरणासाठी पालिका प्रशासनाने निविदा प्रक्रियेद्वारे ठेकेदार नियुक्त करून डांबरीकरणाचा ठेका दिला. मात्र डांबरीकरणाआधी खोदकाम केलेल्या ठिकाणी डबर टाकून भराव व्यवस्थित न केल्याने पावसात शहरातील रस्त्यांची अवघ्या तीन महिन्यातच अवस्था दुर्धर झाली आहे.
अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले, काही भाग निसटला तर काही भागात रस्ते मध्यभागी खचण्याचे प्रकार घडले. तीन महिन्यात रस्त्यांची एवढी दुरावस्था झाल्याने याला सर्वस्वी कंत्राटदारच जबाबदार असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. तीन महिन्यात नादुरुस्त झालेले रस्ते पुन्हा सुस्थितीत करून देण्याची जबाबदारी ठेकेदाराची असून याबाबत ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी बाबर यांनी दिली. बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार पावसानंतर संबंधित ठेकेदाराकडूनच खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करून घेण्यात येईल, असे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.