कोकणात पावसाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. निसर्गाची किमया सगळीकडे दिसू लागली आहे. सगळीकडे धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. पण रत्नागिरी शहरी भागामध्ये पावसाचे प्रमाण मोठ्या वाढल्याने, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले असून, मोठे मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. आणि त्यातून वाहतूक करताना चालक आणि पादचाऱ्यांची देखील कसरत होत आहे.
रत्नागिरी शहर परिसरात सध्या मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. काही महिन्यापूर्वीच केलेल्या डांबरीकरणाच्या रस्त्याला पहिल्याच पावसात खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध नळपाणी योजनेसाठी चर खोदण्यात आले होते. त्या ठिकाणी माती वाहून जाऊन आता खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वी मारुती मंदिर सर्कल येथेही खड्डे निर्माण झाले होते त्याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यावर नगरपरिषदेने हे खड्डे तात्पुरत्या स्वरुपात बुजविले होते, मात्र नगर परिषदेपासून काही फुटांवर असलेल्या जयस्तंभ सर्कल येथे मोठा खड्डा निर्माण झाला असून पावसाचे पाणी रस्त्यावर भरल्यावर हा खड्डा कळत नसल्याने अनेक दुचाकी चालकांचे अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. हा खड्डा मोठा आणि खोल असल्याने त्यामध्ये दुचाकी आदळल्याने अनेक वेळेला दुचाकीस्वार पडण्याचे प्रकार घडत आहेत.
त्याचप्रमाणे एसटी स्टांडच्या समोरील रस्त्यावर सुद्धा रस्त्याची चाळण झाल्याने, भर पावसात रस्ते बुजवण्याचे काम पालिकेने सुरु केले आहे. लहान मोठी वाहने या रस्त्यावरून जाताना मात्र पादचाऱ्यांची हालत खराब होत आहे. वाहत येणारे पाणी अंगावर उडत असल्याने चालायचे तरी कसे असा प्रश्न पादचार्यांना पडला आहे.
जयस्तंभ परिसरातील खड्डे चुकवण्यासाठी वाहने एका बाजूला येत असल्याने रस्त्यावरून चालत जाणाऱ्या पादचार्यांना धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा या ठिकाणी ट्रॅफिक पोलीसही उभे असतात शिवाय नगरपरिषदेचे अनेक अधिकारी या रस्त्यावरून जात असतात, असे असूनदेखील या खड्डा बुजविण्याकडे नगरपरिषदेने अद्यापही दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे नागरिकांना रत्नागिरी पावसाळी सहलीला गेल्याचा भास होत आहे.