जिल्ह्यात महामार्गावर अनेक ठिकाणी दिवसा ते रात्री अपरात्री कधीही अपघातांची मालिका सुरूच असते. नरेंद्र महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिका अनेक ठिकाणी आले कार्य बजावताना कायम पुढाकार घेताना दिसतात. या रुग्णवाहिका चालकांची कार्यतत्परता कायम वाखाणण्यासारखीच आहे.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रूग्णवाहिका चालकांनी कर्तव्यदक्षतेने अनेकांचे प्राण वाचले आहेत. साखरपा येथे बस उलटून तिने पेट घेतला. या अपघातावेळी रुग्णवाहिका देवदूताप्रमाणे मदतीसाठी धावून आल्या. त्यांच्या या मदत कार्याचा गौरव करण्यात आल्याचे प्रतिपादन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यानी केले. भविष्यात देखील आरटीओ कार्यालयातून संस्थानच्या उपक्रमांना नेहमी सहकार्य राहील,अशी ग्वाही दिली आहे.
रत्नागिरीहून बेळगावकडे जाणाऱ्या बसला आंबा घाटाच्या पायथ्याशी १७ नोव्हेबेरला अपघात झाला. बस उलटून तिने पेट घेतला. प्रसंग मोठा होता, सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात होता. तेवढ्यात त्याच मार्गावरून रत्नागिरीकडे जाणाऱ्या जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या इंदापूर-पुणे व नळदुर्ग-उस्मानाबाद येथील रुग्णवाहिका देवदूताप्रमाणे मदतीसाठी धावून आल्या. चालकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या या कार्याचा गौरव रत्नागिरी येथील आरटीओ कार्यालयाने केला.
नरेंद्र महाराज संस्थानाची ही अपघातग्रस्तांसाठीची विनामुल्य सेवा गेली १२ वर्षे अविरत, २४ तास सुरू आहे. महाराष्ट्रातील हद्दीत महामार्गावर २७ ठिकाणी या रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यामुळे कुठेही, कधीही अपघात झाला की, जवळची रुग्णवाहिका तातडीने रात्री अपरात्री अपघातस्थळी जाते. तेथील जखमींना जवळच्या रुग्णालयात पोहोचवले जाते.
संस्थानाच्या रुग्णवाहिकांचे चालक रमेश जाधव, सुनील भोळे व नाशिक कसारा घाट येथील चालक निवृत्ती गुंड, हातखंबाचे चालक धनेश केतकर यांचा सत्कार करण्यात आला. अंजणारी येथे काही दिवसापूर्वी केमिकलचा टँकर नदीत कोसळला होता. याप्रसंगी हातखंबा येथील चालक धनेश केतकर यांनी स्वत: नदीमध्ये उतरून चालकाचा मृतदेह बाहेर काढला होता, त्याचेही विशेष कौतुक अजित ताम्हणकर यांनी केले आहे.