गुजरात ते कन्याकुमारीपर्यंतचा सागरी महामार्ग केव्हाच पूर्ण झाला. समृद्धी महामार्गही पूर्ण होतो; पण मुंबई-गोवा महामार्ग तसेच रेवस-रेड्डी सागरी महामार्ग अनेक वर्ष प्रलंबित राहतात, हे सारे क्लेशकारक आहे. याचे शल्य साऱ्या कोकणवासीयांना आहे. याचा परिणाम कोकणच्या विकासावर होत आहे. त्यामुळे ग्रीनफिल्ड महामार्गापेक्षा या दोन्ही महामार्गाचे काम वेगाने केल्यास कोकणचा विकास फास्ट ट्रॅकवर होईल. अलिकडेच रेवस-रेड्डी सागरी महामार्गाकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने जमीन संपादनाची नोटीस काढली होती; परंतु दिघी बाणकोट, दाभोळ व जयगड या मोठ्या पुलांना अद्याप मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळे अलिबाग-सावंतवाडी ग्रीन फिल्ड महामार्ग कशासाठी व कोणासाठी आहे.
या संबंधी कोकणचे अभ्यासक अॅड. विलास पाटणे म्हणाले, पर्यटकांचे आकर्षण असलेल्या निसर्गरम्य अलिबागला, नवी मुंबई आणि मुंबई महानगरीशी जोडणारा धरमतर खाडीवरील रेवस ते करंजा पूल मार्गी लागला, ही गोष्ट खरी; परंतु बाणकोट बागमंडले पूल नाबार्डकडून अर्थिक सहकार्य मिळूनही गेली दहा वर्ष प्रलंबित आहे, हे विदारक सत्य आहे. ४२ खाड्यांनी व्यापलेल्या डोंगराळ प्रदेशाच्या कोकणपट्टीतून जाणारा ५४० किमीच्या रेवस-रेड्डी सागरी महामार्गामुळे मुंबईचे सध्याचे अंतर ८०/९० किमीने कमी होऊन प्रवासाची वेळ किमान दीड तासाने कमी होईल. कोकणातील बहुतांशी पर्यटन केंद्रे, समुद्रकिनारे, किल्ले, किनारपट्टीवर असल्याने पर्यटन विकासाला गती मिळेल.
आंबा उत्पादन व मत्स्य व्यवसायाला अधिक चालना मिळेल. राष्ट्राच्या संरक्षणाच्या दृष्टीने सागरी महामार्गाचे महत्त्व अधिक आहे. अॅड. पाटणे म्हणाले, सागरी महामार्ग २०१७ मध्ये राष्ट्रीय महामार्ग मंडळाकडे गेला व पुन्हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे २३ ऑक्टोबर २०२० मध्ये सुपूर्द करण्यात आला. सागरी महामार्ग कोकणातील किनाऱ्यालगतच्या अनेक ठिकाणी अरूंद गावठाण भागातून जातो. मोठ्या पुलांकरिता कालबद्ध कार्यक्रम आखून ते वेळीच पूर्ण झाले पाहिजेत. विशेष म्हणजे गुजरातच्या लखपतपासून कन्याकुमारीपर्यंतच्या चार राज्यातील सागरी महामार्ग केव्हाच पूर्ण झाला; परंतु महाराष्ट्र मात्र या मार्गावर खूपच मागे पडला आहे. लॉस एन्जलीस ते सॅनफ्रान्सिस्को धर्तीवरचा रेवस-रेड्डी सागरी महामार्ग पूर्ण झाला, तर तो कोकणच्या विकासाचा महामार्ग ठरेल. त्याकडे लक्ष दिले पाहिजे.
जनता पाठिंबा देणार नाही – खरंच ग्रीनफिल्ड महामार्गापेक्षा मुंबई-गोवा महामार्ग समृद्ध महामार्गाप्रमाणे त्वरित पूर्ण करावा; मात्र कोट्यवधी रुपयांचा हा ग्रीनफिल्ड रस्ता जनतेच्या माथी मारू नये. ग्रीनफिल्डला कोकणी जनता पाठिंबा देणार नाही, हे नक्की. एका बाजूला मिऱ्या नागपूर रस्त्यासाठी सह्याद्री उभा आडवा कापला जातोय त्याचे दुष्परिणाम आपणाला लवकरच जाणवतील; पण त्याकडे कोणाचं लक्ष नाही. कोकणच्या विकासाच्या नावाखाली हा नवीन अलिबाग- सावंतवाडी ग्रीनफील्ड कशासाठी? असेही अॅड. पाटणे म्हणाले.