हातखंबा ते मिऱ्या दरम्यान नागपूर-मिऱ्या महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी डायव्हर्जन बोर्ड नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करीत ठिकठिकाणी रिफ्लेक्टर, वाहतूक सुरक्षा पट्टी, सुरक्षा बोर्ड लावण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. नागपूर-मिऱ्या हायवेचे हातखंबा ते मिऱ्या दरम्यान काम वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी चौपदरीकरणाचे काम टप्प्यात पूर्ण होत आहे, मात्र काही भागात डायव्हर्जनचे फलक नसल्यामुळे दोन्ही बाजूने उलटसुलट वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. कारवांचीवाडी येथे झालेला अपघातही वाहतूक व्यवस्था योग्य नसल्याने झाल्याची चर्चा सुरू आहे. साळवी स्टॉप ते टीआरपीपर्यंत रस्त्याची उंची वाढली असून, याठिकाणी खडी पसरलेली आहे. मोठी वाहनेही वेगाने येत असल्याने दुचाकीस्वार घसरुन पडण्याचे प्रमाण वाढले आहे. साळवी स्टॉप ते चर्मालय चार रस्ता परिसरातही अशीच अवस्था आहे.
याबाबत नागरिकांकडून पोलिसांकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. याबाबत पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी महामार्गाचे काम करणाऱ्या रवी इन्फ्रा कंपनीचे पीआरओ राहूल सिंग, रोडसेफ्टी अधिकारी प्रियरंजन यांच्याशी चर्चा करून सुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पोलिस निरीक्षक तोरसकर, उपनिरीक्षक घाग, पोलिस हवालदार आखाडे यांनी रस्त्याची पाहणी करुन, साळवी स्टॉप, चर्मालय चौक, कुवारबाव, रेल्वेस्टेशन, कारवांची वाडी, हातखंबा याठिकाणी पाहणी केली. त्यानंतर रिफ्लेक्टर, वाहतूक सुरक्षा पट्टी लावण्याचे काम ठेकेदार कंपनीने हाती घेतले. वाहने हळू चालवा व रस्त्याचे काम सुरू आहे याबाबतचे बोर्ड लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. विशेषतः ठेकेदार कंपनीच्या रिकामे डंपर चालकांना गाड्या सुरक्षित चालवण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी दिल्या.