राज्यसभेच्या उमेदवारीकरिता कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी अट घातली असली तरी शिवसेनेत प्रवेश करण्यास छत्रपती संभाजीराजे अनुकूल नाहीत. अपक्षच निवडणूक लढवून, महाविकास आघाडी म्हणून पाठींबा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचे जाहीर केलेले कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश करावा. त्यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, असे सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप संभाजीराजे यांना देण्यात आला होता. संभाजीराजे हे शिवसेनेत प्रवेश करण्यास तयार नाहीत, ते परत कोल्हापूरला परतले आहेत. याउलट महाविकास आघाडीकडील अतिरिक्त मते आपल्याला द्यावीत, असा प्रस्ताव संभाजीराजेंनी शिवसेना व राष्ट्रवादीकडे दिला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ही ३१ तारखेपर्यंत आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन राज्यात हालचालींना वेग आला आहे. संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात येईल, अशी घोषणा शिवसेनेने केली आहे. मात्र, संभाजीराजे अपक्ष लढवण्यावरच अजूनही ठाम आहे. अशात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेची असणारी भूमिका स्पष्ट केली आहे.
संजय राऊत यांनी सांगितले आहे की, संभाजीराजे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ते छत्रपती आहेत. त्यामुळे राज्यसभेसाठी त्यांना विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, संभाजीराजेंकडे त्यासाठी आवश्यक मते नाहीत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेकडे आपल्याला पाठिंबा देण्याची मागणी केली होती. मात्र, शिवसेनेचे स्वत:चे उमेदवार असताना आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा कसा देऊ शकतो? त्यामुळेच आम्ही त्यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. मात्र, अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी ते आग्रही असल्याचे दिसून आल्याचे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले, आम्हाला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा आहे. त्यामुळे आम्ही अपक्ष उमेदवार मग तो कोणीही असो त्याला पाठिंबा देणार नाही. स्वत: उद्धव ठाकरे यांनीच हा निर्णय घेतला असून, राज्यसभेवर शिवसेनेचेच दोन उमेदवार जातील, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.