संगमेश्वर तालुक्यातील साखरपा नजीकच्या ओझरे गावातील ४५०० एकर शेतजमीन विकणे आहे’, अशी जाहिरात एंका राज्यस्तरीय दैनिकात प्रसिद्ध झाल्यावर या जाहीरातीने गावासह संगमेश्वर तालुक्यात एकच खळबळ उडाली. गावच्या ग्राम विकास मंडळ मुंबई शाखेने त्वरीत दखल घेत मुंबई सभा घेतली. शिमगोत्सव काळात चाकरमानी व गावकरी यांची सभा गावात आयोजित केली होती. ती सभा न घेताच अनेक पदाधिकाऱ्यांनी मुंबईत पलायन केल्याने आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. यातील काही पदाधिकारी यात सामील तर नाहीत ना? अशी शंका आता गावकरी व्यक्त करत आहेत. यामुळे मंडळात दोन तट पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ओझरे गावातील जमीन गावकऱ्यांनी विकणे हे चुकीचे आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन विक्रीस काढली गेलेली नाही. ही शुद्ध फसवणूक आहे. असे सरपंच तुकाराम हातिम यांनी स्पष्ट केले. यापुर्वी गावातील फक्त सुमारे दोनशे ते तीनशे एकर जमीन विक्री झाली आहे असे सांगितले.
गावात रोजगार नसल्याने असे काही प्रकार होत आहेत, असेही सरपंचांनी सांगितले. साडेचार हजार एकर क्षेत्रफळाच्या जमिनी चक्क विक्रीला काढल्या असल्याची जाहीरात १५ फेब्रुवारी दरम्यान मुंबईतील एका दैनिकात प्रसिद्ध झाली होती. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर त्यातील दिलेल्या संपर्क क्रमांकावर काही चाकरमान्यांनी संपर्क केला असता धक्कादायक माहिती समोर आली. त्यावर जागरुक मंडळींनी ग्राम विकास मंडळाच्या निदर्शनास आणत त्वरित मुंबई येथे बैठक घेऊन साधकबाधक चर्चा केली व याची शहानिशा करण्यासाठी शिमगोत्सवात ओझरे गावात चाकरमानी स्थानिक गावकरी यांची सभा घेण्यात यावी यावर एकमत झाले. होळी संपली की दि. १६ मार्चला ही सभा घेण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे चाकरमानी गावात आले. पण मंडळाच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सभा न घेताच रातोरात मुंबई गाठल्याने गावकरी संतप्त झाले आहेत.
यात कोणी पदाधिकारी व ग्रामस्थ दलालाला सहभागी नाहीत ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा नजीक वसलेले ओझरे गाव दुष्टचक्रात सापडले आहे. रत्नागिरी पासून काही तासांच्या अंतरावरील ओझरे गावातील शेतजमि नी विकण्यासाठी वृत्तपत्रात रीतसर जाहिरातच दिली जाते हे भयानक असून या भागात नवीन प्रकल्प येऊ घातल्याचे संकेत तर नाहीत ना? यात काही शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनी दलाल मंडळींनी आतापर्यंत गावातल्या काहींना हाताशी धरत दोनशे तीनशे एकर जमिनी खरेदी केल्या आहेत. जिल्ह्यातील बाहेरील लोक येऊन येथे जमिनी खरेदी करतात त्यातील काहींनी हा खोडसाळपणा केलेला आहे. म्हणून आम्ही एकत्रितपणे या विरोधात लढण्यासाठी सज्ज झालो आहोत.
आम्ही आमच्या जमिनी विकायला काढलेल्या नाहीत, असे येथील एका ग्रामस्थाने स्पष्ट सांगितले. दीडशे ते दोनशे घरे असलेले ओझरे गाव खूपच सुंदर आहे. ओझरेचे उत्पन्नाचे साधन शेतीच आहे. जमीन व पाणी मुबलक असलेने गावातील तरुणांनी शहरात न जाता गावातच मेहनत व चिकाटीने शेतीतून चांगले उत्पन्न घेत आत्मनिर्भर होत नवा आदर्श निर्माण करावा. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकू नयेत. त्या जमिनीतून उत्पन्न घेऊन आपला आर्थिक विकास केला तर गावचा विकास होईल. गावाबाहेर पडलेले लोक पुन्हा गावाकडे वळतील, असे मत पर्यावरणप्रेमींनी केले आहे.