गेले आठवडाभर रत्नागिरीसह राज्यात पाच ठिकाणी सावरकर विचार जागरण सप्ताह सुरू आहे. याची सांगता आज (ता. २८) शोभायात्रा, सहभोजनाने होणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमासाठी ऐतिहासिक पतितपावन मंदिराची निवड झाली आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, तसेच राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र शासनाने वीरभूमी परिक्रम अंतर्गत पर्यटन संचालनालय, मुंबईतील विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर संस्था आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर विचार जागरण सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्वा. सावरकर चौक ते हनुमान मंदिर, शिरगाव इथपर्यंत बाईक रॅली, वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा, पथनाट्ये, वाळूशिल्प, त्या तिघी नाट्यप्रयोग, विनायका रे हा संगीतमय कार्यक्रम रंगला. उद्या सकाळी ८ वाजता कारागृह सावरकर स्मारक येथून शोभायात्रेला सुरवात होईल.
वीर सावरकरांची १४० वी जयंती आज असून या दिवशी सकाळी ८ वाजता कारागृह येथील स्वा. सावरकर स्मारक येथून शोभायात्रा निघणार आहे. जयस्तंभ, एसटी स्टँड, राम आळी, गोखले नाका, गाडीतळ मार्गे पतितपावन मंदिर येथे शोभायात्रेची सांगता होईल. यामध्ये विविध संस्थांचे चित्ररथ सहभागी होतील. शोभायात्रा पतितपावन मंदिरात पोहोचल्यानंतर विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सन्मान मंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. ११.३० वाजता सहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रम ांना सावरकरप्रेमी, हिंदुत्ववादी संस्था, संघटनांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक रवींद्र भोवड, पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेश शिंदे, माजी अध्यक्ष अँड. बाबासाहेब परुळेंकर, भागोजीशेठ कीर ट्रस्टचे ट्रस्टी अॅड. विनय आंबुलकर यांनी केले आहे.
मंत्री लोढा घेणार बैठका – मंत्री मंगलप्रभात लोढा हे संकाळी रत्नागिरी विमानतळ येथे येतील. त्यानंतर १९५ वर्षे पूर्ण झालेल्या रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयास सदिच्छा भेट देतील. सकाळी ९.२० वाजता भाजपा कार्यालयात लोकसभा कोअर समिती सदस्य बैठक, शहर बूथ अध्यक्ष व शक्ती केंद्र प्रमुखांच्या . बैठकीत मार्गदर्शन करतील. सावरकर सप्ताहानिमित्त आयोजित शोभायात्रेत सहभागी होतील. सकाळा ११ वाजता पतित पावन मंदिरात मन की बात कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर तेथेच आयोजित सहभोजन कार्यक्रमात सहभागी होतील. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक, वाजता महिला व बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक आणि पर्यटन विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीत मार्गदर्शन करतील.