कोरोना काळापासून, नोकरी कामधंदा यामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेकांचे काम धंदे ठप्प झाले असून, नोकरी गेल्याने अनेक जण बेरोजगार देखील झाले आहेत. काही ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे कि, काम करून देखील वर्षोनुवर्षे पगार मिळत नसल्याने अशा परिस्थितीमध्ये जगायचे कसे असा प्रश्न कर्मचार्यांना पडला आहे.
सावंतवाडी येथील बीएसएनएल कार्यालयात कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना तब्बल दोन ते अडीच वर्षांपासून काम करून देखील पगारच मिळालेला नाही. अशा परिस्थितीत कुटुंबाला काय खाऊ घालायचे आणि स्वतः तरी कसे जगायचे? असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे. त्यांनी आपली ही व्यथा मनसे पदाधिकाऱ्यांकडे मांडल्या.
पदाधिकाऱ्यांनी बीएसएनएल प्रबंधकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात मध्यस्थी केली आहे; मात्र तो प्रश्न सुटू शकला नसून याला संबंधित ठेकेदार कारणीभूत असल्याचे सांगितले. मनसेने संबंधित ठेकेदारांशी संपर्क साधला असता समर्पक उत्तरे मिळाली नाहीत. यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर, सचिव कौस्तुभ नाईक, उपशहर अध्यक्ष प्रवीण गवस, लॉटरी सेना तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर, तिरोडा शाखाप्रमुख मनोज कांबळी आदी उपस्थित होते.
दरम्यान, या गंभीर घटनेची वस्तुस्थिती पडताळून पाहिली असता, हा सर्व घोळ बीएसएनएलचे संबंधित तीन कंत्राटदारांमुळे झाल्याचे उघड झाले. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित राहावे लागल्याचे निदर्शनास आले आहे. येत्या बुधवारी ता. ३० राज ठाकरे यांचा दौरा असल्यामुळे हा सर्व प्रश्न ते निश्चित सोडवतील, असा आशावाद मनसेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी व्यक्त केला आणि संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांना आश्वासीत केलं आहे.