केंद्र शासन व राज्य शासनामार्फत कृत्रिम भित्तिका पाखरण प्रकल्प पारंपरिक व ट्रॉलिंगने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना अडचणींचा ठरत आहे. हा प्रकल्प एकमार्गी नसून, संपूर्ण बंदरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राबवला जात असल्यामुळे जाळी तुटत आहेत. त्यामुळे तातडीने या प्रकल्पाचे काम थांबवण्यात यावे. प्रकल्पाला विरोध नाही; परंतु स्थानिक मच्छीमारांना विश्वासात घेऊन तसेच जनजागृती करून त्यानंतरच हा प्रकल्प राबवण्यात यावा, अशी मागणी रत्नागिरी तालुका शाश्वत मच्छीमार हक्क संघटनेने जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.
भगवतीबंदर जेटीजवळ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कृत्रिम भित्तिका पाखरण अनावरण कार्यक्रम झाला. हा माशांसाठी कृत्रिम घरांचा प्रकल्प राबवला जात आहे. तो पारंपरिक व ट्रॉलिंगने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना अडचणींचा ठरत आहे. स्थानिक मच्छीमारांना मासेमारी करण्यासाठी तो त्रास होत आहे. एकमार्गी हा प्रकल्प नसून, संपूर्ण बंदरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राबवत आहे. त्यामुळे असा प्रोजेक्ट राबवताना स्थानिक मच्छीमारांना विचारात घेऊन राबवण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे मच्छीमारांनी केली आहे.
मच्छीमारांना अपेक्षित मासळी मिळत नसल्यामुळे सर्व मच्छीमारांवर कर्जापोटी उपासमारीची व आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यातच चुकीच्या पद्धतीने प्रकल्प राबवत असल्यामुळे स्थानिक मच्छीमारांना मच्छीमारी करताना जाळी तुटून व फाटून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याचा गांभीर्याने विचार करावा, असे निवेदनात म्हटले आहे.