शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना जिवे मारण्याच्या धमक्या येत असल्याबाबत संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि जाधव यांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशा मागणीचे निवेदन त्यांच्या समर्थकांनी चिपळूण पोलिसांना दिले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांना कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी हे निवेदन दिले. सत्तेचा दुरूपयोग करून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर चुकीची कारवाई सुरू आहे. त्या विरोधात आमदार जाधव लोकांमध्ये जनजागृती करत आहेत. ते आक्रमक भूमिका मांडत असतात.
गेले काही दिवस केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्यांचे पुत्र आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नेते भास्कर जाधव यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर १६ फेब्रुवारीला नीलेश राणे यांची गुहागर मतदार संघात शृंगारतळी येथे सभा होणार आहे. जाधव यांच्या भ्रमणध्वनीवर अज्ञातांकडून धमक्यांचे फोन येत आहेत. जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, हे गंभीर आहे.
अशाप्रकारे सामाजिक शांतता बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला प्रतिबंध करणे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित असते. त्यामुळे नीलेश राणे यांच्या शृंगारतळी येथे होणाऱ्या सभेला पोलिसांनी प्रतिबंध करावा. जाधव यांना येणाऱ्या धमक्या, होणारी चर्चा आणि झालेली विधाने लक्षात घेता त्यांचे निवासस्थान, कार्यालयाला सुरक्षा व्यवस्था देणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. ही सुरक्षा न मिळाल्यास आणि जाधव यांना कोणतीही इजा झाल्यास त्याची सर्व जबाबदारी पोलिसांवर राहील, असे निवेदनात म्हटले आहे.