ईडीने रविवारी रात्री उशिरा शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केल्यानंतर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर चांगलाच निशाणा साधला आहे. संजय राऊत यांच्याबद्दल मला नक्कीच अभिमान आहे. कारण आजच्या राजकारणात केवळ बळाचा वापर करणे सुरु आहे. बळ तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही इतरांना संपवण्याच्या मागे लागणार असाल तर सगळेच दिवस सारखे नसतात. दिवस हे पलटतात. तुमचं पुढे काय होईल याचा विचार सुद्धा करणे भाजप आणि नड्डा यांनी करण्याची आवश्यकता आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
संजय राऊत माझे मित्र आहेत. संजय राऊत पत्रकार, शिवसैनिक आहेत आणि जे पटत नाहीये ते बोलत आहेत. मरण आले तरी शरण जाणार नाही हे त्यांचे वाक्य योग्य आहे. तेही शरण जाऊ शकले असते. जे तिकडे गेले आहेत त्यांच्याभोवती सत्तेचा फेस आहे. तोपर्यंत ते आमच्यावर टीका करु शकतात. तो फेस गेल्यानंतर त्यांच्या परिस्थितीची जाणीव होईल,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली आहे.
हिटलरच्या काळातील परिस्थिती आज आपल्या देशात निर्माण झाली आहे. विरोधात कोणी बोललं तर त्याला अडकवायचचं. पण ठिक आहे न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. आमचा पक्ष संपवायची हौस असेल तर जनतेसमोर या आणि तुमचे विचार मांडा आणि त्यानंतर जनतेला जो काही निर्णय घ्यायचा आहे ते ती घेईल.
अडीच वर्षे मी मुख्यमंत्री होतो पण माझ्या डोक्यात कधीच पदाची हवा गेली नाही. कारण बाळासाहेब सांगायचे की सत्ता येते आणि जाते पण तू नम्र राहा. मी नम्र राहण्याचा प्रयत्न करत आलो आहे. दिवस आणि काळ हा नेहमीच सगळ्यांसाठीच चांगला असतो असं नाही. तो बदलत असतो, असा सूचक इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.