रत्नागिरी जिल्ह्यातील महामार्ग आणि अंतर्गत रस्ते हे कायमच चर्चेचा विषय ठरत आहेत. उन्हाळ्यात नवीन बनवलेले रस्ते एका पावसामध्येच कात टाकत असल्याने नक्की कसल्या दर्जाचे कामकाज केले जाते याबाबत शंकाच निर्माण होत आहे. अनेक रस्त्यांना खाच खळगे, मोठे खड्डे पडलेले आणि त्याच रस्त्यावरून वाहन चालकांनी आपला जीव मुठीत धरून वाहतूक करणे किती योग्य आहे !
देवरुख पांगरी मार्गे रत्नागिरी हा रस्ता काहीसा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतानाच पाटगाव घाटीतील अनेक महिने रखडलेला रस्ता घाई गडबडीत उरकण्यात आला. साईड पट्याही अद्याप करण्यात आलेल्या नाहीत. या रस्त्याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या, उपोषणे आंदोलने झाली; परंतु जिल्हा, स्थानिक विभागाच्या कारभारामुळे सदर रस्ता शेवटी पावसाळ्यामध्ये पूर्ण करण्यात आला. या रस्त्यामध्ये अनेक गैरव्यवहार घडल्याची चर्चा जोर धरत आहे.
काही लोकांनी सदर रस्ता होऊ नये म्हणूनही अनेक प्रयत्न केले होते. अखेरीस पाटगाव घाटीतील थांबविण्यात आलेले हे काम घाईघाईने पूर्ण करण्यात आले. आणि सदरच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्याला भेगा पडल्या असून तो खचू लागला आहे. तसेच पाऊस सुरु झाल्याने तेलासारखा तवंग बाहेर पडत असून त्यावरून घसरून दुचाकीस्वाराचा अपघातही झाला आहे. याची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते.
रस्त्यावर पडलेल्या भेगा बुजवण्यात कॉन्टॅक्ट्ररला यश येईल, पण ऑइल मिश्रित डांबर असल्यास ते कसे लपवण्यात येईल अशी चर्चा सध्या सुरू आहे. याबाबत संबंधीत विभागावर, अधिकारी तसेच इंजिनियर वर त्याचप्रमाणे ठेकेदारावर रस्त्याची पाहणी करून योग्य कारवाई व्हावी असे नागरिक, प्रवाशांचे म्हणणे असून महाराष्ट्र समविचारी मंच संगमेश्वरच्यावतीने जिल्हाधिकारी रत्नागिरीना निवेदन देण्यात येणार आहे, असे सामाजिक कार्यकर्ते व मंच चे संगमेश्वर तालुका अध्यक्ष तसेच मानवाधिकार हक्क संरक्षण असोसिएशनचे कार्याध्यक्ष मनोहर गुरव यांनी सांगितले आहे. तसेच अपघाताची शक्यता असल्याने आणि पावसल सुरु असल्याने विशेष करून वाहनचालकांनी या रस्त्यावरून वाहने सावकाशपणे चालवण्याचे आवाहनही त्यांनी काळजीपोटी केले आहे.