कोकण किनारपट्टीवर गेले आठवडाभर पावसाने चांगलेच झोडपले असून, पावसासह वाऱ्याचा देखील वेग जोरदार आहे. पौर्णिमेच्या उधाणामुळेही समुद्र अजूनच खवळला असून, मोठ्या लाटा समुद्रात उसळत आहेत. समुद्राला नारळ अर्पण करून मासेमारीचा प्रारंभ करणाऱ्यांना मासेमारी सुरू होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. हवामान विभागाच्या सूचनेनुसार, सध्या अजून काही दिवस तरी वातावरण निवळेल, अशी शक्यता दिसून येत नाही.
शासनाच्या निर्देशानुसार, १ ऑगस्टपासून मासेमारी सुरू झाली; परंतु कोकणामध्ये बहुत करून नारळी पौर्णिमा झाली की मच्छीमारीला सुरुवात केली जाते. मच्छीमार समुद्राला नारळ अर्पण करून नौका समुद्रात सोडतात. परंतु, गेले आठ दिवस मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांनी मच्छीमारांची वाट रोखली आहे. बंदी संपुष्टात आल्यावर हर्णै, मिरकरवाडा, जयगड येथील काही मच्छीमारांनी मासेमारीला सुरुवात केली; परंतु वादळ सुरू झाल्यावर ते माघारी परतले.
समुद्र खवळलेला असून, अजस्त्र लाटा उठत आहेत. यात नौका स्थिरावणे शक्य नाही. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाहक धोका पत्करण्यापेक्षा मच्छीमारांनी नौका किनाऱ्यावरच उभ्या करून ठेवणे पसंत केले आहे. सध्या श्रावण महिना सुरू असून, अनेकांचे महिनाभर उपवास असतात. ठिकठिकाणी मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या कालावधीत मासळीला मागणी तशी पाहायला गेलं तर कमी असते. त्यामुळे दरावरही त्याचा निश्चितच परिणाम होतो.
रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या, काळबादेवी, कासारवेली, दापोलीतील पाजपंढरी, हर्णै; तर राजापूरमधील साखरी नाटेसह आजूबाजूच्या किनाऱ्यावरील मच्छीमारांना नारळी पौर्णिमेनंतर वातावरण स्थिरावेल, अशी आशा होती. पण हवामान खात्याने अजून चार दिवस पाऊस आणि वारा राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

