३ सप्टेंबर २०२२ ला शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल आमदार भास्कर जाधव यांच्या सत्काराचे आयोजन त्यांच्या मित्रमंडळाने केले होते. या वेळी जाधव यांनी मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपा राज्यभरात दंगली घडवेल, असे अत्यंत आक्षेपार्ह विधान केले आहे.
गुहागरच्या भाजप कार्यालयात शुक्रवारी सुर्वे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, हे विधान करताना त्यांनी त्या वक्तव्यासाठी कोणतीही माहिती अथवा आधार दिलेला नाही. याचा अर्थ समाजातील दोन घटकांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने, काही समाजघटकांच्या भावना भडकवण्याच्या भावनेतून, जाणूनबुजून हे चिथावणीखोर वक्तव्य त्यांनी केले आहे.
याच भाषणात आमदार जाधव यांनी राज्यभर दौरा करणार असल्याचेही म्हटले आहे. आगामी काळात नवरात्र, दीपावली, ईद यासारखे हिंदू -मुस्लिम समाजाचे सण येत आहेत. या दरम्यान राज्यभराच्या दौऱ्यात आमदार जाधव यांच्याकडून अशा प्रकारच्या व्देषमुलक विधानांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. त्यातून राज्यभरातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडू शकते. हा संभाव्य धोका विचारात घेता आमदार जाधव यांच्यावर वेळीच तातडीने भारतीय दंड विधान संहितेच्या कलम १५३A, २९५A, ५०५ IPC नुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने गुहागरचे पोलिस निरीक्षक आणि रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
या पत्रकार परिषदेला माजी आमदार व उत्तर रत्नागिरी भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष संतोष जैतापकर, तालुका सरचिटणीस सचिन ओक, शहराध्यक्ष संगम मोरे, भाजपचे नगरपंचायत गटनेते उमेश भोसले, अरुण रहाटे यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपा राज्यभरात दंगली घडवेल, असे विधान करणाऱ्या आमदार भास्कर जाधव यांनी या विधानाची पुष्टी करणारा आधार दिलेला नाही. त्यामुळे जाणीवपूर्वक दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या हेतूने त्यांनी विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी भाजपाने केली आहे, असे गुहागर भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी सांगितले.