मागील सहा महिन्यापूर्वीच कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकर या संपूर्ण मार्गावरचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. कोकण रेल्वेने हे काम योग्य कालावधीत पूर्ण केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देखील कोकण रेल्वेच्या कामगिरीची प्रशंसा केली होती; मात्र सहा महिने होऊनही विद्युतीकरण पूर्ण झालेल्या कोकण रेल्वेमार्गावर मालगाड्या आणि एक प्रवासी गाडी सोडली तर सर्व प्रवासी गाड्या डिझेल इंजिनसह धावत आहेत.
रेल्वेने १५ सप्टेंबरपासून टप्प्या टप्प्याने प्रवासी गाड्या विजेवर चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. प्रवासी रेल्वेगाड्या विजेवर चालवण्याच्या टप्पानिहाय कार्यक्रमानुसार दादर-सावंतवाडी तुतारी तसेच मंगला एक्सप्रेसला विद्युत इंजिन जोडण्यात येणार आहे. त्या पाठोपाठ मांडवी, कोकणकन्या एक्सप्रेस तसेच दिवा-सावंतवाडी-सिंधुदुर्ग एक्सप्रेस या प्रवासी गाड्या ३० सप्टेंबरपासून विद्युत इंजिनसह चालवल्या जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
विद्युतीकरणाच्या कामापैकी सर्वात महत्वाच्या असलेल्या सबस्टेशनची कामे पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे प्रवासी रेल्वेगाड्या विजेवर चालवण्याचे नियोजन रेल्वेला लांबणीवर टाकावे लागले होते; मात्र आता या कामातील रत्नागिरीतील टीएसएस पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले आहे. विजेचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकावर उपकेंद्र यासह टनेल, पूल येथून वीजवाहिन्या, विद्युतखांब उभारले आहेत.
मडगाव ते रत्नागिरी या मार्गावर धावणारी गाडीदेखील १५ सप्टेंबरपासून विजेवर जाणार आहे. मुंबई सीएसटी ते करमाळी दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस १५ ऑक्टोबर २०२२ पासून विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे. याचबरोबर उर्वरित गाड्या देखील टप्प्याटप्प्याने विद्युत इंजिनसह चालवल्या जाणार आहेत.

