गणपती, नवरात्री, दसरा आणि आता बाजारपेठ दिवाळीच्या साहित्यांनी फुलू लागली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या बाजारपेठेतील व्यावसायिकांना आता दिवाळीचे वेध लागले आहेत. केवळ आठ दिवसांवर दीपावलीचा सण येऊन ठेपल्याने व्यावसायिकांनी आपापल्या दुकानात साहित्य मागवण्यास सुरुवात केली आहे.
दीपावली सणाच्या निमित्ताने घराच्या रंगरंगोटीसह, लायटिंग, आकाश कंदील, कपडे, फराळाचे पदार्थ, तसेच आणि इलेक्ट्रिक साहित्याची या काळात मोठी उलाढाल होते. त्यामुळे त्या दृष्टीने नियोजन सुरू झाले आहे. परतीचा पावासाने सर्व गोंधळ केल्याने दुकानात अद्याप व्यावसायिकांनी साहित्याची मांडणी केलेली नाही.
अजून परतीच्या पावसाचे संकट असल्याने व्यावसायिक सावधगिरी बाळगत आहेत. अजून दुकानामध्ये म्हणावी तशी साहित्याची मांडणी करण्यात आलेली नाही. चार दिवसांपासून येथे ढगाळ आणि पावसाळी वातावरण असल्याने, सायंकाळच्या सुमारास गडगडाटासह हलका पाऊस सुरूच आहे. त्यामुळे पावसाचे वातावरण निवळण्याची व्यावसायिक आतुरतेने वाट पहात आहेत. सध्या फराळाचे साहित्य घेण्यासाठी किराणा दुकानामध्ये गर्दी होताना दिसत आहे. एकूणच आता येथील बाजारपेठेला दीपावली सणाचे वेध लागले आहेत.
येत्या शुक्रवारी ता.२१ ला वसुबारस आहे. या दिवसापासून दीपावली सणाला सुरुवात होते. त्यामुळे आता आठ दिवसच उरल्याने घरांच्या सजावटीची कामे सुरू झाली आहेत. त्या अनुषंगाने व्यावसायिकांकडे मागणी वाढू लागली आहे. तसेच कापड व्यावसायिकांनी आपल्या दुकानात विविध प्रकारचा माल मागवला आहे. अलीकडे तयार कपड्यांचा जमाना असल्याने ग्राहकांची मागणी ओळखून कापड व्यावसायिकांनी तयार कपडे मागवले आहेत. व्यावसायिक आलेल्या साहित्याची मांडणी करण्यामध्ये व्यस्त आहेत. तसेच विद्युत साहित्य विक्रीच्या दुकानातही आता लगबग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन व्यावसायिक सज्ज झाले आहेत.