चिपळूण पाग येथे आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर अज्ञातांनी चढवलेल्या हल्ला प्रकरणामुळे पोलिस तपास सुरु आहे. त्यानुसार पोलिसांनी सात पथके स्थापन करत तपास सुरू केला. पण दरम्यान, आमदार जाधवांच्या घरासमोर पेट्रोलने भरलेली बाटली सापडल्याने, हाच धागा पकडून चिपळूण पोलिसांनी शहरातील पेट्रोल पंप चालकांना बाटलीतून सुटे पेट्रोल न देण्याचे फर्मान काढले. पण यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, व्यावसायिक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शेती कामासाठी वापरण्यात येणारी मोठ मोठी यंत्रे पंपावर नेणे शक्य होत नाही. परिणामी शेती कामासाठी देखील सुटं पेट्रोल मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्या घरांवर अज्ञातांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याची तक्रार समीर भास्कर जाधव यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात केली होती. त्यानुसार पोलिसांनी जाधवांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फूटेजची देखील पाहणी केली; मात्र अद्याप हा हल्ला कोणी केला हे स्पष्ट झालेले नाही.
सुटे पेट्रोल बंद केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांचे म्हणणे असे आहे कि, शेती व्यवसायासाठी आम्ही विविध अवजारे वापरतो. पॉवर टिलर अथवा विविध यांत्रिकी अवजारासाठी पेट्रोल-डिझेलची आवश्यकता भासते. ही यंत्रे पेट्रोल पंपात नेणे कठीण बनते. शेतकरी एक-दोन लिटर पेट्रोलची बाटली घेऊन त्याची पुनर्विक्री करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांना दिलासा द्यावा.
दरम्यान, आमदार जाधवांच्या घरासमोर झालेल्या हल्ल्यानंतर चिपळूण पोलिसांनी शहरातील पेट्रोल पंपचालकांना पत्र देत सुटं पेट्रोल बाटलीतून वितरित न करण्याची नोटीस दिली आहे. अलीकडच्या काळात ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर सुरू केला. पॉवरटिलर, ट्रॅक्टर, ग्रासकटर आदी यंत्रसामुग्रीसाठी पेट्रोलची आवश्यकता भासते. पेट्रोल घेण्यासाठी शेतकरी ही अवजारे पंपात घेऊन येत नाहीत. दोन-चार लिटर पेट्रोल बाटलीतून ते घेत असतात. ही अवजारे पंपात नेणे खर्चिक व जिकिरीचे असल्याने ते अनेकदा बाटलीतूनच विकत घेत असतात; मात्र पोलिसांच्या नव्या फतव्यामुळे शेतकऱ्यांनाही सुटं पेट्रोल मिळणे बंद झाल्याने ते नाराज झाले आहेत.