राजकारणात झालेली उलथापालथ आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि शिवसेनेमध्ये राजरोस चांगलीच जुंपलेली दिसते. नेते आणि मंत्री एकमेकांविरुध्द आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यातच आता शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी थेट राणे कुटुंबावर निशाणा साधला आहे.
राणे कुटुंबीयांना सत्तेचा माज आला आहे, अशी टीका नाईक यांनी राणे कुटुंबावर केलीय. ते कणकवलीतील श्रीधर नाईक चौक इथं शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेअंतर्गर जाहीर सभेत बोलत होते. यावेळी उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, संजना घाडी आदी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक उपस्थित होते.
वैभव नाईक म्हणाले, भाजपकडून अनेकांना घाबरवले जात आहे. त्यांच्यावर अनेक आरोप करून विविध प्रकारची चौकशी लावली जात आहे. पण, त्यांच्या दहशतीला शिवसेना भीक घालणार नाही. वेळ पडल्यास जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करू. सध्याचा काळ संघर्षाचा आहे, कसोटीचा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायत निवडणुका लागल्या आहेत. त्यांच्या निकालातून दिसेल की जनता व आपण उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी निष्ठेने आहोत. कोकणात भाजलेल्या कोंबडीला आगीची भीती नाही, अशी म्हणं आहे. आम्हाला कसलीही भीती नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पुढे बोलताना राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा देखील खरपूस समाचार घेतला. शिवरायांनाही स्वराज्य निर्मितीसाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. राज्यपालांनी अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. तर, राज्य तोडण्याचं काम भाजपने केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्ता जाणार हे अगोदरच ज्ञात होतं. परंतु, त्यांच्या कठीण काळात देखील आम्ही खंबीरपणे त्यांना पाठींबा देत पाठीशी उभे राहिलो आहोत.