गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मागील सुमारे पाच दशकांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान सीमावाद सुरू आहे.कर्नाटक आणि महाराष्ट्रात भाजप सत्तेत आहे. मात्र, या दोन्ही राज्यांतील भाजप नेते सीमाप्रश्नी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यातच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीमधील जत तालुका आणि सोलापूर, अक्कलकोटवर दावा सांगितल्यानंतर सीमावाद दिवसागणिक पेटत चालला आहे.
या प्रश्नावर महाराष्ट्रासह सीमावर्ती भागांत अनेकदा तीव्र आंदोलनं झाली आहेत. या वादावरून दोन्ही राज्यांमध्ये न्यायालयीन लढाईदेखील सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचं दहन केल्यामुळं आता कर्नाटकातील मराठी भाषिकांविरोधात तीव्र संपात व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात लोकांच्या भावना भडकवल्या जात असल्याचं मत सीमाभागातील मराठी भाषिकांमधू व्यक्त केली जात आहेत.
कर्नाटकातील गदगमध्ये महारष्ट्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शन केली आहेत. यावेळी महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेली वाहने अडवून धरून, त्या वाहनांवर चढून कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रा विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचं कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी दहन केलं आहे. त्यामुळं आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील अनेक पक्षातील खासदारांनी सीमावादाचा प्रश्न केंद्रानं सोडवावा अशी मागणी केली आहे. त्यामुळं हा वाद केंद्रानं सोडवण्याच्या मागणीनं जोर धरला असतानाच कर्नाटकात मात्र महाराष्ट्रविरोधी वातावरणानं आणखी जोर पकडलाय. कर्नाटकात महाराष्ट्राविरोधात वातावरण आणखी चिघळल्याने हे वाद कधी संपुष्टात येतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.