मासेमारी बंदी आदेश धाब्यावर ठेवून तालुक्यातील जयगड, वरवडे, कासारवेली, काळबादेवी बंदरामध्ये बेकायदेशीर मासेमारी सुरू आहे. मत्स्यखाते व सागरी सुरक्षारक्षकांच्या आशीर्वादाने ही बेकायदेशीर मासेमारी सुरू असून ती देशांच्या सागरी सुरक्षेला धोका निर्माण करणारी आहे. अशा मच्छीमार नौकांवर मत्स्यखात्याने कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी करणारे निवेदन रत्नागिरी तालुका शाश्वत मच्छीमार हक्क संघटनेने सहायक मत्स्य आयुक्त विभागाला दिले. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अन्वये यावर्षी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलाधी क्षेत्रात यांत्रिक नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरी सुद्धा रत्नागिरीतील जयगड, वरवडे, कासारवेली, काळबादेवी या बंदरामध्ये मत्स्यखात्याच्या आशीर्वादाने व सागरी सुरक्षारक्षकांच्या सहकार्याने राजरोजपणे यांत्रिक नौकेने मासेमारी जोरात चालू आहे.
बंदरावर नेमणूक केलेले सागरी सुरक्षा रक्षक कार्यरत असतात. तरी त्यांना रोखले जात नाही किंवा मत्स्य खात्याला याची माहिती दिली जात नाही. त्यामुळे या सागरी सुरक्षारक्षकांना बडतर्फ करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. अशा बेकायदेशीर मासेमारीमुळे देशांच्या सागरी सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. अशा मच्छीमार नौकामालक व त्या नौकावर काम करणारे खलाशी यांच्यावर मत्स्यखात्याने कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. नौकावर कारवाई केली नाहीतर संबंधित मत्स्यखात्याच्या अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल का करण्यात येऊ नये तसेच या विषयी आम्ही सर्व शाश्वत मच्छीमार मंत्रालयात दाद मागणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.