पावसजवळील निरुळ येथील प्रसिद्ध सांब मंदिर आणि परिसरात पर्यटकांची पावसाळी पर्यटनासाठी गर्दी होत आहे. या मंदिराच्या जवळून नदी वाहत असून येथे होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन येथील ग्रामपंचायतीने शासकीय आदेशानुसार सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. याठिकाणी पर्यटकांसाठी सूचना फलक लावून दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. पावसाळा सुरू झाला कि तळी, नदी-नाले, धबधबे असे नैसर्गिक प्रवाहीत होतात. या ठिकाणी मौजमजा करण्यासाठी पर्यटक धाव घेतात. निरुळ येथील सांबमंदिर आणि त्याच्याशेजारून वाहणारी यामुळे येथे पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी होत आहे. त्यामुळे निरूळ ग्रामपंचायतीने दक्षतेसाठा येथील नदीच्या किनारी यासंबंधी फलकही लावला आहे. येथे पर्यटकांना सूचना देण्यासाठी आणि पाण्यात जाण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे.
पावसाळ्यात ‘येथील नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने येते पोहणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे येथे पोहण्यास मज्जाव करण्यात आल्याचे ग्रामपंचायतीने फलकाद्वारे! सांगितले आहे. तरीही पर्यटक या सूचना न पाळता पाण्यात उतरत असल्याने ग्रामपंचायतीने पर्यटकांकडून शुल्क आकारण्यास सुरवात केली आहे. याबाबत पर्यटक तीव्र नाराजी व्यक्त करत असले तरी याठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू नये, हाच यामागील उद्देश ‘असल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे. यामुळे पर्यटक आणि कर्मचारी यांच्यात वादावादी होत आहे. या संदर्भात माजी जिल्हा परिषद सदस्य उदय बने म्हणाले, निरुळ गावातील नदी किनारी मौजमजा करण्यासाठी येणारे लोक मोठ्या प्रमाणात दंगामस्ती करून परिसर अस्वच्छ करतात.
याठिकाणी पोहणे धोकादायक असतानाही लहान मुलांनाही पाण्यात उतरवतात. याचा त्रास येथील स्थानिकांना होतो. पर्यटकांनी या परिसरात केलेली घाण साफ करता यावी, यासाठी एका माणसाची नेमणूक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या ठिकाणची स्वच्छता राखता येईल, ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार लहान मुलांना पाच रुपये व मोठ्या मुलांना लोकांना दहा रुपये आकारणी शासन निर्णयानुसार करण्यात आली आहे. त्या जमा पैशातून नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार भागवता येईल. येथे येणाऱ्यांचे प्रमाण फक्त पावसाळ्यातच जास्त असते. त्यामुळे तिथे नेमेलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार भागवणेही कठीण आहे.
शुल्क घेतल्यास सुविधाही हव्यात – येथील परिसराचे सुशोभीकरण शासनाकडून केले आहे. शुल्क आकारताना तेथे ग्रामपंचायतीने कोणत्याही सुविधाही दिलेल्या नाहीत. पर्यटकांसाठी चेंजिंग रूम, लाईफ गार्ड, कचरा टाकण्यासाठी डस्टबिन आदी व्यवस्था नाही. प्रत्येक ठिकाणी शुल्क वसुली झाली तर नागरिकांनी ते सहन का करायचे असा प्रश्नही तिथे गेलेल्या पर्यटकांनी विचारला होता.