शहरात आठवडा बाजारात झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्य रामचंद्र बाबाजी शेळके (४८, रा बारसू खालचीवाडी) यांच्या वारसांना ताडतीने शासकीय मदत देण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव पाठवला आहे. राजापूर पालिकेच्या वतीने शेळके यांच्या कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून २५ हजार, तर तीनही जखमी महिलांना उपचारासाठी प्रत्येकी पाच हजारांची मदत जाहीर केली आहे, अशी माहिती नगर पालिकेच्या प्रशासक व प्रांताधिकारी वैशाली माने व मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली आहे. महसूल प्रशासनाच्यावतीने शासनाच्या नियमाप्रमाणे चार लाख रुपये मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आल्याची माहिती तहसीलदार शीतल जाधव यांनी दिली.
शहरात बंदरधक्का-गणेश विसर्जन घाट परिसरात गुरुवारी भरलेल्या आठवडा बाजारात या ठिकाणी असलेला गुलमोहराचा वृक्ष अचानकपणे उन्मळून कोसळल्याने आठवडा बाजारात खरेदीसाठी आलेले रामचंद्र बाबाजी शेळके (४८, रा. बारसू खालचीवाडी) हे जागेवरच ठार झाले होते, तर मुमताज आसिफ फणसोपकर, यास्मिन शौकत कोतवडकर व सायका इरफान पावसकर या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलवण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रशासनाकडून या नुकसानीबाबत पंचनामा करण्यात आला. नगरपालिका हद्दीत ही घटना घडल्याने नगर पालिकेने शेळके यांच्या वारसांना २५ हजाराची मदत जाहीर केली.
जखमी तीनही महिलांना उपचारासाठी प्रत्येकी पाच हजाराची मदत तातडीने देण्यात येणार असल्याचे भोसले यांनी सांगितले. धोकादायक वृक्षांचे पालिकेकडून सर्वेक्षण पालिका प्रशासनाने शहरातील धोकादायक असलेल्या वृक्षांचे सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. यापूर्वी पालिकेकडून काही जागामालकांना त्यांच्या जागेत असलेल्या धोकादायक वृक्ष तोडण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत; मात्र तरीही त्यांनी ती तोडली नसतील तर पालिका प्रशासन ती तोडणार आहे, तर शहरात सार्वजनिक ठिकाणी धोकादायक वृक्ष तोडण्याबाबत कार्यवाही हाती घेतली.