वर पाहिजे या नावाखाली येणाऱ्या काही जाहिरातींमुळे अनेकांची फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे. मुलाचे लग्न होत नाही तर आमच्याशी संपर्क साधा. या जाहिरातींमुळे अनेकांना फुकटचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यांच्या भावनांशी खेळून आर्थिक लूट केली जात आहे. अशा फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. दोन, चार हजारांसाठी पोलिस ठाण्याच्या चकरा कशाला मारा, असा विचार करून फसवणुकीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी आई-वडील शासकीय किंवा खासगी नोकरीत चांगल्या हृदयावर असलेल्या किंवा यशस्वी व्यावसायिक असलेल्या मुलाचीच वर म्हणून निवड करतात. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्याचा फायदा घेऊन काही जण वधू-वर सूचक मंडळाच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केली जात असल्याचे उघड झाले आहे. देखण्या मुलींचे फोटो दाखवले जातात. काही ठिकाणी पत्ता वेगवेगळा मात्र मुलगी तिच असते. विवाह करणे आहे, मुलीच्या नावे चार एकर जमीन आहे, अशा प्रकारचा मजकूर जाहिरातींमध्ये आहे. सर्वसाधाणपणे मुलीला आई-वडील नसतात किंवा एकच कोणीतरी असतं.
मुलगी देखणी असते. वय साधारण २४, २८, २९ या घरात असतं. त्यांच्या नातेवाईकांनी नाशिक, नागपूर, शिर्डी इत्यादी ठिकाणी वधू-वर सूचक केंद्रात नाव नोंदवलेल असतं. मुलीच्या कोणत्याही अटी नसतात. मुलाची माहिती, फोटो मागवून मग मुलीची माहिती दिली जाते. पत्ता हवा असल्यास दोन, तीन हजार भरून नावनोंदणी करायला सांगतात. हा सगळा घोटाळेबाज प्रकार आहे. कोकणातील विवाह न जमणाऱ्या मुलांना जाळ्यात ओढणारी ही टोळी असावी, फसवणूक होऊ नये म्हणून काळजी घ्या असे आवाहन फसवणूक झालेल्या सावंत यांनी केले आहे.