कोकण रेल्वेमार्गावर मोठा गाजावाजा करत वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली आहे. सुपरफास्ट रेल्वे म्हणून तिला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, वंदे भारत एक्स्प्रेमुळे कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या महत्त्वाच्या ५ गाड्या सायडिंगला पडल्या आहेत. त्यामुळे या गाड्यांतून प्रवास करणाऱ्यांना उशीर होत आहे. मुंबईहून सुटणारी वंदे भारत एक्स्प्रेस सेमी हायस्पीड दर्जाची वातानुकूलित एक्स्प्रेस आठ तासांत मडगावला पोहोचवण्याचे उद्दिष्ट रेल्वेने ठेवले आहे. त्यामुळे या गाडीला नेहमीच ट्रॅक उपलब्ध करून द्यावा लागत आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांसाठी याच मार्गावर धावणाऱ्या पाच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसना बसला आहे.
वंदे भारतला बाजू देण्यासाठी या गाड्या सायडिंगला टाकल्या जात आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना ताटकळत राहावे लागत आहे. वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईतून पहाटे ५.२५ वा. सुटते. मान्सून वेळापत्रकाप्रमाणे दुपारी तीनच्या सुमारास मडगावला पोहोचते. त्यामुळे या कालावधीत कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या नागपूर-मडगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस या गाड्या थांबवून ठेवण्यात येतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव तेजस एक्स्प्रेस या गाडीलाही नेहमीच लेटमार्क लागत आहे. तसेच दुपारी मडगावहून मुंबईसाठी सुटणारी तेजस एक्स्प्रेसही सायडिंगला पडत आहे.